नाशिक शहरात तब्बल १,१८६ धोकादायक वाडे
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात तब्बल एक हजार १८६ धोकादायक वाडे असून, वाडे तत्काळ रिकामे करण्याची गरज आहे. मात्र, याठिकाणीही प्रशासनाने नोटिसांपुरतीच मजल मारल्याने धोकादायक वाड्यांचा विषय ऐरणीवर आला आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी अशोकस्तंभ येथे कारच्या धडकेत वाडा कोसळल्याची घटना घडली होती. त्यानंतर प्रशासनाने नोटिसा बजावल्या होत्या. नंतर मात्र धोकादायक वाड्यांचा विषय जणू काही विस्मृतीतच गेला आहे.
महापालिकेचे तत्कालीन आयुक्त रमेश पवार यांनी धोकादायक वाडे पोलिस बंदोबस्तात रिकामे करणे, त्यांचे वीज आणि पाणी कनेक्शन तोडण्याची जबाबदारी विभागीय अधिकाऱ्यांवर सोपविली होती. मात्र, बहुतांश वाडे राजकीय प्रतिनिधींच्या ताब्यात असल्याने विभागीय अधिकारी कारवाईस कचरत आहेत. अशात केवळ नोटिसाच बजावल्या जात असल्याने, या वाड्यांचा धोका निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी वाडामालक व भाडेकरू यांच्यात वाद असल्याने भाडेकरू वाडा रिकामे करत नसल्याचे चित्र आहे.
मनपाचे ‘वरातीमागून घोडे’
पावसाळा सुरू होण्यापूर्वी मनपाकडून दरवर्षीप्रमाणे धोकादायक वाडेधारकांना नोटिसा बजावण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. प्रत्यक्षात मात्र कारवाई केली जात नाही. गेल्या महिन्यात तर पंचवटी परिसरातील वाडा पडल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या संबंधित विभागाच्या कर्मचाऱ्याने विभागीय अधिकाऱ्यासमोर वाडेधारकाला नोटीस बजावली. जर आधीच नोटीस बजावली असती, तर वाडेधारकाने थोडीफार डागडुजी तरी केली असती आणि वाडा पडल्याची घटनाही कदाचित टळली असती.