फक्त १ रुपयात पीक विमा : ३१ जुलैपर्यंत मुदत; ‘असा’ करा अर्ज | प्रधानमंत्री पीक विमा योजना | Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY) | पुढारी

फक्त १ रुपयात पीक विमा : ३१ जुलैपर्यंत मुदत; 'असा' करा अर्ज | प्रधानमंत्री पीक विमा योजना | Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY)

खरीप हंगामातील सर्व पिकांचा समावेश | Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY

सुनिल थोरे

पुढारी वृत्तसेवा, चांदवड : प्रधानमंत्री पीक विमा योजनेला खरीप २०२३-२४ ते रब्बी हंगाम २०२५-२६ या तीन वर्षाकरिता मान्यता देण्यात आलेली असून त्यासाठी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लि. नियुक्त करण्यात आलेली आहे. खरीप हंगामात बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद, व खरीप कांदा या पिकांसाठी विमा संरक्षण प्राप्त झाले आहे. (Pradhan Mantri Fasal Bima Yojana PMFBY)

प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतिम मुदत आणि हप्ता किती?

प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी ३१ जुलै २०२३ पर्यंत मुदत असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पिकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. चालू खरीप हंगामापासून सर्वसमावेशक पिक विमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला असून शेतकऱ्यांना प्रती अर्ज केवळ रु. १/- विमा हप्ता भरावयाचा आहे. या योजनेअंतर्गत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ही योजना ऐच्छिक करण्यात आली असून कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेस किंवा पतपुरवठा करणाऱ्या संस्थेस कळविणे बंधनकारक आहे.

कोणत्या आपत्तींचा समावेश?

या योजनेतंर्गत पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, दुष्काळ, भू-सख्खलन, पावसातील खंड, किड व रोग इत्यादीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट जोखमीच्या बाबीमध्ये समाविष्ट केलेली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान तसेच नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढनी पश्चात नुकसान यांचा जोखमीच्या बाबींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे.

कोणत्या पिकांचा समावेश?

सर्व प्रमुख अन्नधान्य, गळीत धान्य आणि नगदी पिकांचा समावेश या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे. खरीप हंगाम २०२३-२४ करिता पीक निहाय भरावयाचा विमा हप्ता व संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे – बाजरी – विमा संरक्षित रक्कम ३०,०००/- मका – विमा संरक्षित रक्कम रु.३५,५९८/- मुग – विमा संरक्षित रक्कम रु.२०,०००/- उडीद – विमा संरक्षित रक्कम रु.२०,०००/- भुईमुग – विमा संरक्षित रक्कम रू.४२,९७१/- सोयाबीन – विमा संरक्षित रक्कम रु.४९,५००/- खरीप कांदा – विमा संरक्षित रक्कम रु.८१,४२२/-

भरपाईची प्रक्रिया काय?

पिकांचे नुकसान झाल्यास शेतकरी बांधवांना ७२ तासांच्या आत पीक विमा ॲप, कंपनी प्रतिनिधी किंवा टोल फ्री क्रमांकावर कळवावे लागणार आहे शेतकरी बांधवांनी ई पीक पाहणी अतंर्गत पिकांची नोंद करणे आवश्यक असणार आहे. विमा योजनेत विमा घेतलेले पीक व ई पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक यामध्ये तफावतीचा मुद्दा उद्भवल्यास ई पीक पाहणीमध्ये नोंदविलेले पीक अंतिम गृहित धरण्यात येणार आहे.

अर्जाची कसा करावा?

शेतकऱ्यांनी आपल्या पेरणी केलेल्या पिकांना विमा संरक्षण मिळण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे व पीक विमा भरण्यासाठी आपल्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र अथवा राष्टीयकृत बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहनही कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. शेतकरी महा ई सेवा केंद्र,सामुदायिक सुविधा केंद्र,ग्रामपंचायतींचे संग्राम केंद्र,राष्ट्रीयकृत बँका येथून पीक विमा काढू शकतील.

आवश्यक कागदपत्रे कोणती?

आवश्यक कागदपत्रे कोणती? आवश्यक असलेली कागदपत्रे : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी ७/१२ उतारा, खाते उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, पीक परेणी स्वयं घोषणापत्र या कागदपत्रांची छायांकित प्रत सादर करणे आवश्यक असणार आहे.

पीक विमा योजनेमध्ये सहभागी होणेसाठी शेतकरी हिस्सा रक्कम रु.१/- इतकी नाममात्र असून तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हावे व आपल्या पिकाचा विमा काढून घ्यावा. – विलास सोनवणे, तालुका कृषी अधिकारी, चांदवड. 

हेही वाचा

Back to top button