'इंडिया' आघाडीची सभा : मुख्यमंत्री शिंदेंना अनिल देशमुखांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
पुढारी ऑनलाईन डेस्क : इंडिया आघाडीची आज (दि.१७ मार्च) मुंबईतील शिवाजी पार्क येथे सभा पार पडत आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटावर बोचरी टीका केली. या टीकेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
अनिल देशमुख माध्यमांशी बाेलताना म्हणाले की, “महाराष्ट्रासाठी तो ‘काळा दिवस’ होता ज्या दिवशी एकनाथ शिंदे यांनी प्रत्येक आमदाराला ५० कोटी रुपयांची लाच देऊन शिवसेनेचे ५० आमदार फोडून मुख्यमंत्री झाले. त्याचबरोबर अजित पवार यांनी देखील ४० आमदारांसह आमचा पक्ष सोडला, तो दिवसही महाराष्ट्रासाठी ‘काळा दिवस’ ठरला हाेता.”
काय म्हणाले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
‘इंडिया’ आघाडीच्या सभेबाबत माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हाेते की, “शिवसेनेसाठी आजचा दिवस काळा दिवस आहे. शिवाजी पार्कमधून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण देशाला मार्गदर्शन केले, त्याच शिवाजी पार्कवरील उद्यानात इंडिया आघाडीची सभा होत आहे. वीर सावरकरांविरोधात बोलणाऱ्यांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत. यात सहभागी होत आहेत, हे दुर्दैव आहे. आगामी निवडणुकीत जनता त्यांना धडा शिकवेल.”
हेही वाचा :