चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरेंची मागणी | पुढारी

चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा : उद्धव ठाकरेंची मागणी

पुढारी ऑनलाईन ; बाबरी मशीद उद्ध्वस्‍त करण्यात एकाही शिवसैनिकाचा सहभाग नव्हता असा खळबळजनक दावा उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. एका वृत्‍तवाहिनीवरील कार्यक्रमात घेतलेल्‍या विशेष मुलाखतीमध्ये चंद्रकांत पाटील यांनी हे विधान केले होते. आपण व्यवस्‍थापनासंदर्भातील कामासाठी अयोध्येमध्ये स्‍वत: उपस्‍थित होतो, असेही ते म्‍हणाले होते. पाटील यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटील यांच्यावर कडाडून हल्‍ला केला. चंद्रकांत पाटील यांचा राजीनामा घ्‍यावा अन्यथा स्‍वत: हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्‍या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी त्‍यांनी केली.

तुम्‍हाला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरायचा हक्‍क नाही

तुम्‍हाला बाळासाहेबांचा अपमान करणाऱ्या भाजपसोबत रहायचे असेल, तर मग तुम्‍हाला बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरायचा हक्‍क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्या भाजप सारख्या पक्षासोबत किती दिवस राहायचे? हे त्‍यांनी ठरवावे, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले. मी जेव्हा अयोध्येला गेलो तेव्हा शिवजन्म भूमीची माती घेऊन गेलो होतो. आम्ही कायदा करा म्हणत होतो; पण पंतप्रधानांनी हिंमत झाली नाही. शेवटी निकाल कोर्टाने दिला. मिंधेंना बाळासाहेबांचे शिवसेनेचे पवित्र नाव घेण्याचे अधिकार नाही, असेही उद्धव ठाकरे म्‍हणाले.

भाजपकडे शौर्य नाही, आमचे हिंदुत्‍व हे राष्‍ट्रीयत्‍व

बाबरी मशीद पाडल्‍यानंतर काहीही अंगलट येउ नये म्‍हणून भाजपन त्‍यावेळी शिवसेनेकड बोट दाखवलं. त्‍यावेळी आपल्‍या पंतप्रधानांचं नावही कुठे नव्हतं. यानंतर मुंबईत जी दंगल उसळली. तेव्हा शिवसेनेनं बाळासाहेब ठाकरेंनी मुंबई वाचवली. भाजपकडे शौर्य नाही. आमचे हिंदुत्‍व हे राष्‍ट्रीयत्‍व आहे. मोंगलांचा इतिहास पुसताना भाजप हिंदुंचा इतिहास पुसण्याचं काम आहे.

मुंबई दंगलीवेळी शिवसैनिक रस्त्यावर लढले. एकीकडे भागवत मशिदीत जातात. आता कव्वालीच्या माध्यमातून प्रचार करणार आहेत. सत्तेसाठी लाचारी करणारे मिंधे यांनी चंद्रकांत पाटलांचा राजीनामा घेतला पाहिजे अन्यथा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा. त्यांनी बाळासाहेबांचे नाव घेऊ नये, असे आवाहनही त्‍यांनी केले.

ज्यांना कर्तृत्व नसतं ते चोरी करतात

बावनकुळे वगैरे माझ्या खिजगिनतीत पण नाहीत. चंद्रकांत पाटील बोलले आहेत. श्रेयवादाचा प्रश्नच नाही. ही भाजपची चाल आहे. ज्यांना कर्तृत्व नसतं ते चोरी करतात. मनावर ओझे ठेवून दगड बसवलाय ते सहन होत नाहीए म्हणून त्यांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही. यांचे गोमूत्रधारी हिंदुत्व. हिंदुत्वाचा बुरखा घातलाय त्यात आत अत्यंत विकृत चेहरा त्यांचा आहे. बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणवणारे कुणाला जोडे मारणार आहेत ? की स्वतः च स्वतःला जोडे मारणार आहेत? अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हेही वाचा :  

Back to top button