आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले सणासुदीत निर्बंध वाढवण्याचा विचार नाही | पुढारी

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले सणासुदीत निर्बंध वाढवण्याचा विचार नाही

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक निर्बंध वाढविण्याबाबत कोणताही विचार नसून नागपूरसह राज्यातील संपूर्ण परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. संख्या कुठे वाढते आहे? का वाढते आहे, यावर विशेष लक्ष आहे. पहिल्या आणि दुसर्‍या लाटेचा अनुभव लक्षात घेऊनच पुढील निर्णय घेण्यात येतील, असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.

कोविडच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेता आगामी सण-उत्सवाच्या काळात राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांसह जनतेने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, ऑक्सिजन उत्पादनाची 1300 मेट्रिक टनापर्यंत आपली क्षमता होती, ती आता 1400 ते 1500 मेट्रिक टन इतकी झाली आहे. ऑक्सिजनचे 450 पीएसए प्लांट उभारण्यात येत असून, 250 प्लांट्स कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित 200 प्लांट लवकरच सुरू होतील. ऑक्सिजनची साठवणूक क्षमता वाढविण्यासह ड्युरा सिलिंडर्सची संख्या वाढवत आहोत.

त्यामुळे आपल्याकडे 1900 ते 2000 मेट्रिक टनापर्यंत ऑक्सिजनची उपलब्धता होऊ शकते. केंद्र सरकारने तिसर्‍या लाटेचा अंदाज व्यक्त करताना खूप मोठा आकडा सांगितला आहे. ज्यादिवशी 700 मेट्रिक टनच्या वर ऑक्सिजनचा वापर होईल त्यावेळी निर्बंध सुरू करू अशा प्रकारची अधिसूचना आरोग्य विभागाने काढली आहे, असे ते म्हणाले.

5 जिल्ह्यांत राज्यातील 70 टक्के रुग्ण

केरळमध्ये ओणमच्या सणानंतर रुग्णवाढ झाली. एका-एका दिवसात 31 हजारांपेक्षा जास्त रुग्णवाढ झाली आहे. गर्दी करून नियम नाही पाळले तर रुग्णसंख्या वाढणारच हे यातून स्पष्ट झाले आहे. आज राज्यातील 4 ते 5 जिल्ह्यांतच एकूण रुग्णसंख्येच्या 70 टक्के रुग्णसंख्या आहे. त्यात अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, मुंबई, पुणे या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यामुळे शिस्त पाळावीच लागेल, नियमांचे पालन करावेच लागेल तरच तिसरी लाट रोखता येईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

तिसरी लाट थोपवणे नागरिकांच्या हातात : टोपे

आगामी गणेशोत्सवासाठी शुभेच्छा देतानाच शासनाच्या कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने केरळ आणि महाराष्ट्राला गर्दी टाळण्याची जाणीव करून दिली आहे. राज्यातील नागरिकांचे लवकरात लवकर लसीकरण करून त्यांना सुरक्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.

त्यामुळे तिसर्‍या लाटेची दाहकता कमी करणे शक्य होईल. तिसरी लाट थोपवायची असेल तर मोठ्या प्रमाणात लसीकरण करणे आणि आरोग्य विभागाने दिलेल्या अधिसूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. त्यामुळे मंडळांनी, गणेशभक्तांनी शिस्तबद्धपणे कोविड नियमांचे पालन करून हा उत्सव साजरा करण्याचे आवाहन राजेश टोपे यांनी केले.

Back to top button