मुंबई : फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली - उद्धव ठाकरे | पुढारी

मुंबई : फडणवीसांनी बाळासाहेबांच्या नावाने मते मागणे म्हणजे मोदी पर्व संपत आल्याची कबुली - उद्धव ठाकरे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मते मागायचा केविलवाणा प्रयत्न करणे म्हणजे एकप्रकारे नरेंद्र मोदी यांचे पर्व संपले असल्याची कबुली फडणवीस यांनी दिली, अशी टिप्पणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.

षण्मुखानंद सभागृहात झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाषण करताना, आपल्याला बाळासाहेबांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवायची आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. त्यावर उद्धव म्हणाले, फडणवीस यांचे हे वक्तव्य बघता, आता मोदींच्या नावाने मते मागून उपयोग होणार नाही हेच त्यांनी एकप्रकारे अधोरेखित केले. मोदी पर्व संपल्याचीच ही नांदी आहे, आणि त्याची कबुली फडणवीस यांनी दिली.

भाजपच्या धोरणानुसार वापर संपला की नवीन नाव शोधायचे आणि त्यांच्या नावाने मते मागायची आणि आपली सत्तेची तळी भरायची असाच हा प्रकार आहे. या निमित्ताने भाजपचा खरा चेहरा देवेंद्र फडणवीस यांनी समोर आणला. महाराष्ट्रातील जनता त्यांना मतपेटीतून याचे उत्तर देईलच, असा विश्‍वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्‍त केला.

Back to top button