जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती | पुढारी

जळगावच्या चटईची सातासमुद्रापार कीर्ती

जळगाव : केळी आणि सोन्यासाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावचे नाव आता जगभर चटई उद्योगाच्या माध्यमातूनही होत आहे. जळगावच्या चटईने सातासमुद्रापार आपली कीर्ती पसरवली असून तंत्रज्ञानात स्वावलंबन मिळवत समस्यांवर मात केली आहे. पर्यावरणपूरक असलेल्या या व्यवसायातून हजारो जणांना रोजगार मिळाला आहे. जळगावतील चटई उद्योगातून दरवर्षाला कमीत कमी 100 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल होत आहे.

जळगावात 1987 सुप्रीमने चटई उद्योगाची मुहूर्तमेढ केली. त्यानंतर वर्षभरातच 120 कंपन्यांपर्यंत या उद्योगाने मजल मारली. आजच्या घडीला एकट्या जळगावात दीडशेवर चटई फॅक्टरी कार्यरत आहेत. जगात एकमेव जळगाव असे ठिकाण आहे, जेथे एवढे चटई युनिट सुरू आहेत. असे असले, तरी शासनसाच्या दुर्लक्षामुळे या उद्योगाला अजूनही पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. यामुळे उद्योजकांना अनेक समस्यांना समोरे जावे लागत आहे.

अशी बनते चटई…

प्लास्टिक अथवा टाकाऊ वस्तूंपासून चटई बनविली जाते. त्यासाठी देशभरातून दीड हजार टन या पद्धतीचे भंगार आणले जाते. त्यानंतर त्यातून प्लास्टिक दाणे बनवून चटई बनविली जाते. टाकाऊ वस्तूतून टिकाऊ चटई निर्माण केली जाते. या उद्योगातून 10 हजार जणांना रोजगार मिळाला आहे. जळगावात तयार झालेल्या चटई दुबई, केनिया, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये निर्यात केली जाते. चटई व मशिनरी निर्यातीमुळे जळगावात मोठे परकीय चलन उपलब्ध होते. स्थानिक पातळीवर रोजगारही उपलब्ध होत आहे. फेकून दिलेल्या प्लास्टिकवर प्रक्रिया करून त्याचा पुन्हा वापर केला जातो. त्यामुळे पर्यावरण संवर्धनाला या उद्योगातून एकप्रकारे हातभार लागत आहे.

शासकीय मदतीची अपेक्षा…

गेल्या 25 वर्षांपासून आम्ही चटईनिर्मितीच्या व्यवसायात आहे. यात आजवर अनेक चढउतार अनुभवले आहेत. चटई उद्योग हा पर्यावरणपूरक व्यवसाय असल्याने त्याच्या भरभराटीसाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. परंतु, या क्षेत्रातील उद्योजकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुळात हा उद्योग लघुद्योग स्वरूपात असल्याने यात उच्चशिक्षित इंजिनिअर येत नाहीत. अर्धकुशल कामगारांकडूनच काम केले जाते. त्यामुळे शासनाने या उद्योगाच्या भरभराटीसाठी काही सवलती देऊन, जीएसटी माफ करावा, अशी मागणी चटईनिर्माता अरविंद पाटील यांनी केली आहे.

Back to top button