पैठण : नाथसागर धरणातून गोदावरी नदीत ७५ हजार ४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग
पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण येथील नाथसागर धरणामध्ये वरील धरणातून येणाऱ्या पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. गुरुवारी रात्री दहा वाजता नाथसागर धरणाचे १८ दरवाजे चार फूट खुले करून गोदावरी नदीत ७५ हजार ४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळपासूनच पैठण तालुक्यातील काही गावांसह नाथसागर धरणाच्या वरील भागात जोरदार पाऊस सुरू आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पन्नास हजारहून अधिक पाण्याची आवक जमा होत आहे. त्यामुळे व यापूर्वीच येथील नाथसागर धरण १०० टक्के भरल्याने पाण्याची आवक लक्षात घेता पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, शाखा अभियंता विजय काकडे, अशोक चव्हाण यांनी गुरुवारी रात्री नाथसागराचे १८ दरवाजे चार फूट खुले करून गोदावरी नदीत ७५ हजार ४५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडला आहे. दरम्यान शुक्रवारी (दि. 21) धरणामध्ये येणाऱ्या पाण्याची आवक यापेक्षा अधिक सुरू राहिल्यास अठरा दरवाज्याची उंची वाढविण्याची शक्यता येथील नियंत्रण कक्षातून व्यक्त करण्यात आली आहे.
हेही वाचा