पन्हाळ्याला औरंगजेबाने घातलेल्या वेढ्याचा नकाशा प्रकाशात; ताराराणींच्या शौर्याला उजाळा | पुढारी

पन्हाळ्याला औरंगजेबाने घातलेल्या वेढ्याचा नकाशा प्रकाशात; ताराराणींच्या शौर्याला उजाळा

सागर यादव

कोल्हापूर :  इसवी सन 1700 मध्ये औरंगजेबाने गुप्तहेर उस्मान करवाल व मुख्तारखान यांच्या साहाय्याने तयार केलेल्या पन्हाळा किल्ल्याच्या मूळ नकाशाचे छायाचित्र डेक्कन कॉलेज, पुणे येथील पुरातत्त्व संशोधक सचिन पाटील यांनी उजेडात आणले आहे. या नकाशामुळे पुन्हा एकदा महाराणी ताराराणी यांच्या शौर्यगाथेवर प्रकाश पडला आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि राजाराम महाराजांच्या अनुपस्थितीत महाराणी ताराराणी, सरसेनापती धनाजी जाधव आणि पन्हाळा किल्ल्याचे तत्कालीन किल्लेदार परशुराम त्र्यंबक यांनी 1692 ते 1701 असा सुमारे 9 वर्षे किल्ला सर्व बाजूंनी सुमारे 30 ते 40 हजारांच्या मुघल सैन्याचा वेढा पडलेला असतानाही धैर्याने व पराक्रमाने झुंजत ठेवला.

शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे राज्य ताब्यात घेण्यासाठी मुघल बादशहा औरंगजेब दिल्ली सोडून महाराष्ट्रात आला. त्याने मराठ्यांची राजधानी रायगड ताब्यात घेतली. यानंतर त्याने उपराजधानी पन्हाळ्याकडे कूच केली. औरंगजेबाने आपला नातू मुईझुद्दीन याला प्रचंड दारूगोळा व सैन्यासह पन्हाळा ताब्यात घेण्यासाठी पाठवले होते. त्यावेळी छत्रपती राजाराम महाराज दक्षिणेकडील जिंजी किल्ल्यावर होते. महाराणी ताराराणी, सरसेनापती धनाजी जाधव यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळ्याचे किल्लेदार परशुराम त्र्यंबक यांनी सलग 9 वर्षे किल्ला लढविला. यामुळे शेवटी औरंगजेबाला स्वतः युद्धात भाग घ्यावा लागला. तत्पूर्वी, औरंगजेबाचे गुप्तहेर उस्मान करवाल व मुख्तारखान यांना किल्ल्याची सर्व माहिती असलेला नकाशा बनविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. योजनेनुसार इसवी सन 1701 ला औरंगजेबाने जवळपास 30 हजार सैन्याच्या साहाय्याने पन्हाळा किल्ला ताब्यात घेण्याचा मनसुबा तयार केला. त्याआधीच त्याने पन्हाळ्याच्या वेढ्याचा नकाशा तयार केला होता.

मुघल दरबारातील नोंदी

मुघल दरबारातील नोंदीनुसार, दि. 1 नोव्हेंबर 1692 रोजी एका गुप्तहेराने औरंगजेबाला पन्हाळा किल्ल्याला फक्त दोन दरवाजे असल्याची माहिती दिली. दि. 1 एप्रिल 1693 च्या नोंदीनुसार, हिंदू व राजपूत राजे व सरदारांनी पन्हाळ्यास वेढा घातला. इतकेच नव्हे, तर पन्हाळ्याच्या वेढ्यात होळीचा सणही साजरा केला होता. यानंतर दि. 26 ऑगस्ट 1700 रोजी खवासपूर (सांगोला परिसर) येथे वास्तव्यास असलेल्या औरंगजेबाने पन्हाळा किल्ल्याचा नकाशा पाहिला. सलग 9 वर्षे रणरागिणी ताराराणी यांच्या कुशल नेतृत्वाखाली पन्हाळगड लढविला. अखेर दि. 28 मे 1701 रोजी औरंगजेबाने किल्ला ताब्यात घेतल्याची नोंद असल्याची माहिती सचिन पाटील यांनी दिली.

पन्हाळगडाच्या नकाशाची वैशिष्ट्ये

या नकाशात पन्हाळगडावरील वाघ दरवाजा, तीन दरवाजा, सोमेश्वर तलाव, सदोबा तलाव, खोकड तलाव तसेच किल्ल्याचे मुख्य दरवाजे दिसतात. चार दरवाजा हा रणमंडळ प्रकारातील मोठा दरवाजा वक्र बाजूने दर्शविला आहे. इसवी सन 1660 मध्ये सिद्धी जोहरच्या वेढ्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावरील प्रत्येक बुरूज आणि तटबंदीस तोफांच्या साहाय्याने मजबूत केले होते. त्या तोफांचेही अस्तित्व या नकाशावर दाखवले आहे. या वेढ्यामध्ये प्रामुख्याने मुघल, हिंदू, राजपूत आणि बि—टिश सैनिक असल्याने बि—टिश ध्वजासह भगवे व हिरव्या रंगाचे झेंडे यात दिसतात. तसेच बि—टिश अधिकारी सर विल्यम्स नॉरिस यांनीही या युद्धात भाग घेतला होता, असे संदर्भ साधनात दिसत असल्याची माहिती पाटील यांनी दिली.

Back to top button