जामिनावर सुटका झाली; मिरवणुका कसल्या काढता : खा. महाडिक
कोल्हापूर : महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार लोकायुक्त कायद्याचा मसुदा विधिमंडळात संमत करून घेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मात्र भ्रष्टाचाराच्या आरोपावरून तुरुंगवास भोगणारे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामिनाचा सोहळा साजरा करत होते. जामिनावर सुटका झाली, मिरवणुका कसल्या काढता, असा सवाल भाजपचे खा. धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.
देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या खंडणी वसुलीचा आरोप झाला, तेव्हाही राष्ट्रवादी आणि ठाकरे सरकार त्यांना पाठीशी घालत होते. भाजप सरकार भ्रष्टाचाराविरोधात कठोर पावले उचलत आहे. जामिनावर मुक्त झालेल्या आरोपीच्या स्वागतास व मिरवणुकीस हजर राहण्यासाठी सरकारी विमानाचा गैरवापर केल्याप्रकरणी अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. अनिल देशमुख, संजय राऊत आदी नेते आरोपी आहेत. त्यांची निर्दोष मुक्तता झालेली नाही. त्यामुळे पुन्हा त्यांना तुरुंगात जायची वेळ येईल, तेव्हा पुन्हा मिरवणुकीने त्यांची पाठवणी करणार का, असा खोचक सवालही महाडिक यांनी केला आहे.