दहावी, बारावी निकालाचा टक्‍का वाढणार? | पुढारी

दहावी, बारावी निकालाचा टक्‍का वाढणार?

कोल्हापूर ; प्रवीण मस्के : दहावी आणि बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांसाठी बाह्य परीक्षक न बोलावता शाळा, महाविद्यालयांतील अंतर्गत परीक्षकांच्या सहाय्याने परीक्षा घेण्याची परवानगी राज्य मंडळाने दिली आहे. यामुळे प्रात्यक्षिक गुणांमध्ये वाढ होऊन निकालाचा टक्‍का वाढण्याची शक्यता आहे.

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने बारावीची 4 मार्चपासून, तर दहावीची 15 मार्चपासून लेखी परीक्षा सुरू होणार आहे. राज्य मंडळाने परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. 14 फेब्रुवारीपासून बारावीच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांना प्रारंभ होणार आहे.

राज्य मंडळाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यात शाळांना अंतर्गत परीक्षकांकडून तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांच्या तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेणार आहेत. दहावी, बारावीसाठी 80 गुणांची लेखी परीक्षा व 20 गुण वर्षभरातील कामगिरी व अंतिम तोंडी, प्रात्यक्षिक परीक्षेसाठी दिले जातात.

कोल्हापूर विभागातून बारावीसाठी सुमारे 1 लाख 24 हजार व दहावीसाठी सुमारे 1 लाख 35 हजार विद्यार्थी परीक्षेला बसणार आहेत. शाळांकडून परीक्षेची तयारी सुरू झाली आहे. यापूर्वी अंतिम तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षेसाठी बाह्य परीक्षकांची नियुक्‍ती केली जात होती. त्यामुळे विद्यार्थी परीक्षेला महत्त्व देत होते. गेल्यावर्षी कोरोनामुळे परीक्षा न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, यंदा शाळेतील शिक्षकच तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षा घेणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांचे जादा गुण दिले जाण्याची भीती व्यक्‍त केली जात आहे.

विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्‍नपेढी

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर शाळा पूर्णवेळ सुरू राहू शकल्या नाहीत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू होते. दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांना प्रश्‍नांचा सराव व माहिती व्हावी, यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे विषयनिहाय प्रश्‍नपेढी विकसित करण्यात आली आहे. प्रश्‍न पेढ्या ुुु.ारर.रल.ळप या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत. यामुळे परीक्षेला जाण्यापूर्वी प्रत्येक विषयांचा सराव, स्वयंअध्यापनासाठी प्रश्‍नपेढीची मदत होणार आहे.

परीक्षार्थींना मिळणार समुपदेशकांची साथ

राज्य मंडळाच्या वतीने दहावी, बारावी परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना येणार्‍या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष व हेल्पलाईनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कक्षाद्वारे प्रत्येक विभागात काही अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. हे अधिकारी पालक, विद्यार्थ्यांना अडचणी सोडविण्यास मदत करणार आहेत. त्याचबरोबर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे प्रशिक्षित व प्रमाणित मार्गदर्शक व समुपदेशक नेमण्यात आले आहेत.

Back to top button