![प्रवीण दरेकर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F08%2F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A4.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मुंबई पुढारी ऑनलाईन : शिवसेना खासदार विनायक राऊत यांचे राजकारण नारायण राणे यांना शिव्या दिल्याशिवाय व यांच्या विरोधात टोकाचे बोलल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तेच त्यांचे भांडवल आहे. म्हणून पुन्हा पुन्हा आगीत तेल ओतण्याचे काम विनायक राऊत करत असल्याची टीका आज विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.
अंकुश राणे या सख्या चुलत भावाची हत्या कोणी केली, त्यांना कोणत्या गाडीतून नेण्यात आले? कुठे जाळण्यात आले? असे प्रश्न आज विनायक राऊत यांनी उपस्थित केले असून राणे आणि त्यांच्या पुत्रांच्या जुनी प्रकरणाची यादी वाचून 'राणे कुंडली' आमच्याकडे असल्याचा उल्लेख केला.
यावर प्रतिक्रिया देताना दरेकर म्हणाले की, आगीत तेल ओतण्याचे काम विनायक राऊत यांनी करू नये. कोकणची जनता शांतताप्रिय आहे. नुकत्याच झालेल्या गोंधळामुळे सर्व जण त्रस्त आहेत.
आता वातावरण निवळत असताना, ठीक होत असताना ते वातावरण परत पेटले पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे का? पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणून वातावरण बिघडवण्याचा विनायक राऊतांचा मानस आहे का? असे प्रश्न उपस्थित करत दरेकर यांनी राऊतांवर टीका केली.