रत्नागिरीत एप्रिल अखेरपासून पाण्याची होणार कपात? | पुढारी

रत्नागिरीत एप्रिल अखेरपासून पाण्याची होणार कपात?

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : यलनिनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्यास रत्नागिरी शहराच्या पाणीपुरवठ्यात मोठ्या अडचणी निर्माण होण्याची भीती आहे. त्यामुळेे यावर्षी एप्रिल महिन्याच्या अखेरीपासूनच पाणीकपात होण्याची शक्यता आहे. आठवड्यातून एकदा की एकदिवसाड पाणीपुरवठा करायचा, याबाबत रत्नागिरी नगर परिषदेकडून नियोजन केले जात आहे. गेल्यावर्षी मे महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यापासून एकदिवसाआड पाणीपुरवठा केला गेला आहे.

रत्नागिरी शहराचा पाणीपुरवठा एकट्या शीळ धरणावर अवलंबून आहे. या धरणाची पाणी साठवण क्षमता 4.371 दशलक्ष घनमीटर इतकी आहे. हे पाणी दरवर्षी जून महिन्याच्या अखेरीपर्यंत पुरवठ्यास येते. सध्या शीळ धरणात 1.400 द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा असून, तो जून अखेरीपर्यंतच पुरणारा आहे.

पानवल धरण आणि नाचणे तलावातील पाणी पूर्णपणे आटले आहे. नाचणे जलशुद्धीकरण केंद्राचे काम सुरू असल्याने या दोन्ही ठिकाणचे पाणी शहरवासीयांना देता आले नाही. त्यामुळे शीळ धरणावरचा भार वाढला. पानवल धरणात 511 द.ल.घ.मी. पाणीसाठा असतो. इतके पाणी शीळ धरणातूनच द्यावे लागले आहे. अशा परिस्थितीत यलनिनोची भीती आहे. यलनिनो ही दर्यावर्ती प्रक्रिया असल्याने संपूर्ण देशातील मान्सून लांबणीवर पडण्याचा आणि पावसाचे सर्वसाधारण प्रमाण कमी असण्याचा अंदाज आहे. या परिस्थितीत रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणार्‍या शीळ धरणातील पाणीसाठा मान्सून सुरू होण्यापूर्वीच संपला तर पर्यायी व्यवस्था नाही. परिणामी, पाऊस लांबल्यास शहराच्या पाणी पुरवठ्याची समस्या गंभीर होण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी शहरात 10 हजार 288 नळ जोडण्या आहेत. शहराला दररोज 19 ते 20 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत शीळ धरणात 1.400 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून तो जून अखेरपर्यंत पुरवठ्यास येऊ शकतो. यलनिनोमुळे पावसाळा लांबला तर पाण्याची गडबड होऊ शकते. या पार्श्वभूमीवर संभाव्य धोका ओळखून एप्रिल महिन्याच्याच अखेरीपासून पाणीपुरवठ्यात कपात होण्याची शक्यता आहे.

नळ जोडणीसाठी अर्जसंख्या वाढली

रत्नागिरी शहरात बहुसंख्य विहिरी खासगी मालकीच्या आहेत. सार्वजनिक विहिरी 4 ते 5 असून या सर्व विहिरींमधील पाणी आताच तळाला गेले आहे. याचा परिणाम म्हणून रत्नागिरी नगर परिषदेकडे नवीन नळ जोडणी मागणी वाढली आहे. यलनिनोचा धोका ओळखून पाणी काटकसरीने वापरण्याची गरज निर्माण झाली आहे. नगर परिषदेच्या अधिकारी व अभियंत्यांनी पाणी टंचाई निवारणाचे नियोजन सुरू केले आहे.

Back to top button