नगर : सीनेतून पहिले आवर्तन सुटले ! | पुढारी

नगर : सीनेतून पहिले आवर्तन सुटले !

कोंभळी : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत, श्रीगोंदा व आष्टी तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी वरदान ठरलेल्या कर्जत तालुक्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण प्रकल्पातून पाहिले उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले. शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडण्यात आल्याची माहिती सीना धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी संदीप शेळके यांनी दिली. एकूण 25 दिवस आवर्तन चालू राहणार असून, हेड टू टेल, असे पाणी देण्यात येणार आहे. उजव्या कालव्यातून 100 क्यूसेकने विसर्ग होत आहे. सध्या सीना धरणाच्या लाभक्षेत्रातील पिके भहरलेली असताना पिकांना पाण्याची गरज निर्माण झाली, त्यामुळे पिके व फळबागांना जीवदान मिळणार असल्याने शेतीचा पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

सीना धरणाची 2400 दशलक्ष घनफूट पाणी साठवण क्षमता असून सध्या 1283.91 दशलक्ष घनफुट उपयुक्त पाणी साठा उपलब्ध आहे.एका आवर्तनासाठी 284 दशलक्ष घनफुट पाणी लागत आहे.या आवर्तनात एकूण 900 हेकटर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.सीना कालव्याचे नूतनीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय टळला आहे. सध्या पिके जोमात असताना पाण्याची टंचाई निर्माण होण्याची चिन्ह होती या मुळे शेतकरी वर्ग धास्तावला होता मात्र सदर आवर्तन सुटल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आवर्तन सोडण्यात आले असून, सीना धरण प्रकल्पात भरपूर पाणीसाठा आहे. शेतकर्‍यांनी पाण्याचा योग्य वापर करावा. जेणेकरून पुढील आवर्तनावर याचा परिणाम होणार नाही. पुढील आवर्तन सर्व शेतकर्‍यांना हेड टू टेल मिळू शकेल.
              – संदीप शेळके, उपविभागीय अधिकारी, सीना धरण प्रकल्प

आदार रोहित पवार यांच्या प्रयत्नामुळे कुकडी कालव्याद्वारे सीना धरणात पाणी सोडण्यात आले. त्यामुळे नदीचे पाणी आणि कुकडीच्या पाण्याने सीना धरण लवकर भरले होते. आमदार पवार यांच्या योग्य नियोजनामुळे दोन वर्षांपासून शेतकर्‍यांना योग्य वेळेत आवर्तन मिळत असल्याने सीना पट्ट्यातील शेतकरी समृद्ध होत आहे.
                      – संदीप गांगर्डे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

Back to top button