नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेतून केलेल्या आरोपांना किरीट सोमय्या यांनी बुधवारी सकाळी नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले. अलिबागमध्ये रश्मी ठाकरे यांची मालमत्ता असल्याचे पुरावेही सोमय्या यांनी सादर केले. अलिबागमधील 19 घरांचा कर रश्मी उद्धव ठाकरे, मनीषा रवींद्र वायकर यांनी भरला आहे. बंगले नावावर नाहीत तर मग यांनी कराचा भरणा का म्हणून केला, असा सवाल सोमय्या यांनी यावेळी केला.
संजय राऊत यांच्याकडून जोड्याने मारण्याची भाषा वापरण्यात आली. त्यावर नाराजी व्यक्त करीत भर पत्रकार परिषदेत सोमय्या यांनी चप्पल काढली व आपण सादर केलेले पुरावे खोटे असल्यास जोड्याने मार खाण्यास तयार आहे, असे प्रतिआव्हान संजय राऊत यांना दिले.
नील सोमय्यांविषयी बोलताना सोमय्या म्हणाले, 400 कोटीला मारा गोळी, तो छोटा प्रोजेक्ट आहे. दोन वर्षांपूर्वी नील संबंधित कंपनीशी जोडला गेला. नील आणि किरीटला जेलमध्ये टाकायचे असेल तर आम्ही जायला तयार आहोत. खोल्या सॅनिटाईझ्ड नसतील तरी चालेल, असे खुले आव्हान सोमय्या यांनी राऊत यांना दिले.
कोरोना सेंटरमध्ये झालेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी पुन्हा रेटून धरली. घोटाळ्याच्या चौकशीची भीती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना वाटत आहे. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेसाठी लढणार्याला 'ब्लॅकमेलर' म्हणणे चुकीचे आहे. उलट तुमच्यामुळे कोरोना रुग्णांवर अत्याचार झाल्याचे सोमय्या म्हणाले.
पीएमसी बाँकेतील घोटाळ्याशी दमडीचा संबंध नाही. बँकेतून एक पैसा सुद्धा घेतलेला नाही. ज्या फ्रंटमॅनबद्दल राऊत बोलत आहेत, तो कोणाचा माणूस आहे, ते येत्या काही दिवसांत समोर येईल. राकेश वाधवान किंवा पीएमसी घोटाळा याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. उलट पीएमसी घोटाळा मीच बाहेर काढला, असा दावा सोमय्या यांनी केला. डीएचएफल घोटाळा देखील आम्हीच बाहेर काढला. तरीही संजय राऊत यांच्याकडे याच्याशी संबंधित कागदपत्रे असतील तर त्यांनी ते ईडीने एवढ्यावेळा त्यांना बोलावले तेव्हाच द्यायला हवे होते, ते आताही देऊ शकतात, असे सोमय्या म्हणाले.
रश्मी ठाकरे, मनीषा वायकर यांनी टॅक्स भरला नाही, असे लिहून द्यावे. त्यांची घरे नाहीत, असे पुरावे द्यावे. जर असे काही नसेल तर तर मला माझे दोन्ही जोडे मारा, असे सोमय्या यावेळी म्हणाले. राऊत यांच्याकडून माझ्याबद्दल करण्यात आलेल्या आरोपांची खुशाल चौकशी करावी, असे आव्हान ही सोमय्या यांनी दिले. 19 बंगल्यावर मी घेऊन जातो. 2013 ते 2021 या काळात सगळा कर रश्मी ठाकरे यांनी भरला आहे. घर नाही तर घरपट्टी का भरतात? मला कशाला, रश्मी ठाकरेंना, उद्धव ठाकरेंना तिथे घेऊन जा, मनीषा वायकर यांना तिथे घेऊन जा, असे सोमय्या म्हणाले. ग्रामपंचायतीने दिलेल्या कागदपत्रांचा पुरावा देखील त्यांनी यावेळी सादर केला.
रश्मी ठाकरे यांनी 12 नोव्हेंबर 2020 रोजी कर भरला. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर ही घरपट्टी भरली. 5.42 लाख असे ग्रामपंचायतीने व्हॅल्युएशन दाखवले. 2008 मध्ये व्हिजिट करून घर बांधून झाले. अॅग्रिमेंट 2014 मध्ये केले. मुख्यमंत्र्यांनी 12 नोव्हे 2020 ला प्रॉपर्टी टॅक्स भरल्यानंतर ती घरे चोरीला गेली का? असा सवाल सोमय्या यांनी केला. त्यासंबंधी मी तक्रार केली आहे, त्याची चौकशी करा, घर नाही हे दाखवायचे नाटक कशाला करता, असा खोचक सवाल देखील सोमय्या यांनी राऊत यांना उद्देशून केला.
1 एप्रिल 2013 ते 31 मार्च 2021 पर्यंतचा 19 बंगल्याचा कर यांच्या खात्यातूनच गेला आहे. 11 नोव्हेंबर 2020 रोजी अन्वय नाईक आणि उद्धव ठाकरे यांच्यातील जमिनीचे तसेच व्यावसायिक संबंध मी उघड केले होते. अन्वय नाईक यांनी 2008 मध्ये हे बंगले बांधले होते. हे ठाकरे सरकारनेच दिलेले रेकॉर्ड आहे. 2009 पासून दरवर्षी या बंगल्याचा कर भरला जात आहे. आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे, मनीषा वायकर हा कर भरत होत्या, असा आरोप सोमय्यांनी केला. आजपर्यंत उद्धव ठाकरे काहीही बोलले नाहीत. रश्मी ठाकरे बोलल्या नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे बंगले चोरीला गेले की, ते खोटे बोलत आहेत, हे दोनच प्रश्न आता शिल्लक असल्याचे सोमय्या म्हणाले.
रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी बंगल्यासंदर्भात ग्रामपंचायतीची माफी मागितली आहे. हे पत्र संजय राऊत यांच्याकडे आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला. विशेष म्हणजे हे घर वनखात्याच्या जमिनीवर आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर खुन्नस काढायची असेल तर किरीट सोमय्यांचा वापर कशाला करता? असा सवाल यावेळी सोमय्या यांनी राऊतांना केला.