शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरीत घडलेल्या हिंसाचाराच्या ( Lakhimpur Kheri case ) घटनेचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश राकेश कुमार जैन यांना नियुक्त केले आहे. या प्रकरणाच्या तपास निष्कर्षांमध्ये निष्पक्षता, पारदर्शकता तसेच पूर्ण निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या नियुक्ती केली जाते, असे सरन्यायाधीश एनव्ही रमन्ना यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने स्पष्ट केले.
लखीमपुर खीरी येथे ( Lakhimpur Kheri case ) ३ ऑक्टोबरला घडलेल्या घटनेत ४ शेतकर्यांसह ८ जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार अजय कुमार मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा यांच्या ताफ्यातील वाहनांनी शेतकऱ्यांना चिरडल्याचा दावा करण्यात आला होता.
घटनेचा तपास करण्यासाठी उत्तर प्रदेश पोलीस दलाकडून स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकात खंडपीठाने तीन आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश केले आहे. दीपिंदर सिंह, श्री शिरोडकर तसेच पद्मजा चौहान यांना एसआयटीमध्ये समाविष्ठ करीत पथकाचे पुर्नरचना केली जाईल, असे खंडपीठाने स्पष्ट केले. घटनेचा तपास सेवानिवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत करण्यास उत्तर प्रदेश सरकारने सहमती दर्शवल्यानंतर खंडपीठाने बुधवारी हे निर्देश जारी केले.
उत्तर प्रदेश सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीत लखीमपुर खीरी क्षेत्रातील पोलीस उपनिरीक्षक ग्रेडच्या अधिकार्यांना स्थान देण्यात आले होते. अशात उत्तर प्रदेशातील नसलेले युपी कॅडरमधील आयपीएस अधिकाऱ्याचे नाव खंडपीठासमक्ष सादर करण्याचे निर्देश त्यामुळे न्यायालयाने सरकारला दिले होते.