पुढारी ऑनलाईन: 1983 मध्ये भारताने पहिल्यांदा विश्वचषक जिंकला होता. दिग्दर्शक कबीर खान या विजयाची कहाणी '83' चित्रपटाद्वारे घेऊन येत आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये कॅप्टन कपिल देव यांच्या त्या खेळीची झलकही पाहायला मिळते, जी आजपर्यंत कोणालाही पाहायला मिळालेली नाही. कपिल देव यांनी झिम्बाब्वेविरुद्ध १७५ धावांची खेळी केली होती, ज्याने केवळ हा सामना जिंकला नाही तर विश्वचषकातून बाहेर जाणाऱ्या टीम इंडियाला पुन्हा शर्यतीत आणले होते.
1983 च्या वर्ल्ड कपमध्ये झिम्बाब्वे विरुद्धचा सामना टीम इंडियासाठी करो या मरो असा होता. भारत हा सामना हरला असता तर विश्वचषकातून बाहेर पडला असता. टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच संघाला मोठे धक्के बसत गेले.17 धावांवर संघाचे पाच फलंदाज बाद झाले होते. कपिल देव फलंदाजीला आले तेव्हा त्यांच्यासमोर पाचवी विकेट पडली. यानंतर त्यांनी 138 चेंडूत नाबाद 175 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्यांनी 16 चौकार आणि 6 षटकार मारले होते. त्यावेळी वनडे क्रिकेटमध्ये फलंदाजाकडून खेळलेली ही सर्वात मोठी वैयत्तिक खेळी होती. भारतीय संघ जेव्हा फलंदाजीसाठी उतरला तेव्हा कपिल देव हे ड्रेसिंग रूमच्या आत बाथरूममध्ये अंघोळ करत होते. कॅप्टन कपिल देव आंघोळ करत असताना एकामागून एक पाच विकेट पडल्या होत्या. हीच गोष्ट चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.
कपिल देव यांनी खेळलेल्या १७५ धावांच्या खेळीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग होऊ शकले नाही. तसेच लोकांना हा सामना रेडिओवर ऐकता आला नाही. त्यावेळेस बीबीसी इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप लाईव्ह कव्हर करत होते. झिम्बाब्वे विरुद्ध सामन्याच्या दिवशी बीबीसीचे सर्व कर्मचारी संपावर गेले होते. यामुळे कपिल देव यांची ही ऐतिहासिक खेळी ना कोणी लाइव्ह पाहू शकले, ना त्याचे कोणतेही व्हिडिओ रेकॉर्डिंग करता आले. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ही खेळी शानदारपणे दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग कपिलची भूमिका साकारत आहे.
कपिल देव यांनी स्वतः '83' चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि लिहिले की, "ही माझ्या टीमची कथा." ट्रेलर पाहून, आपण अंदाज लावू शकतो की आपल्या खेळाडूंनी देशाची प्रतिष्ठा आणि गौरव वाढवण्यासाठी परदेशी भूमीवर किती मेहनत घेतली आहे. ट्रेलर पाहून चाहते चित्रपटाला हिट म्हणत आहेत.
रणवीर आणि दीपिका व्यतिरिक्त ताहिर राज भसीन, जीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, अम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य करवा, आर बद्री आणि पंकज त्रिपाठी हे देखील या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
हेही वाचा: