मनसे महायुतीत आल्याने काही अडचण ? भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
पुढारी ऑनलाइन डेस्क : मनसे महायुतीत आल्याने नाशिकच्या जागेसंदर्भात कोणताही पेच निर्माण झालेला नाही. याउलट मनसे महायुतीत सामील झाल्याने आमची शक्ती वाढेल. त्यांच्यामुळे कोणताही पेच नाही. ते कोणतीही अडचण करायला आले नाही. त्यांना सगळं माहिती आहे, ते वरच्या पातळीवर चर्चा करत असल्याची प्रतिक्रीया छगन भुजबळ यांनी दिली आहे.
दरम्यान नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत संघर्ष पेटला आहे. महायुतीतील तीनही पक्षाकडून या जागेवर दावा केला जातो आहे. त्यावर बोलताना भुजबळ म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस, बीजेपी व शिवसेना अशा तीनही पक्षात चर्चा सुरु आहे. बऱ्याच गोष्टींवर एकमत झाले आहे. कुठे राग, रुसवे फुगवे आहेत ते तपासत आहोत. नाशिकची जागा पाहिजे म्हणून काहीजण गेले. बीजेपी घोषवारा घेते आहे तसेच राष्ट्रवादी घेत आहे. त्यानंतर अंतिम जो कोणी उमेदवार ठरेल, त्या मागे तीन्ही पक्ष मजबुतीने उभे राहतील. भुजबळ उमेदवारीसाठी आग्रही नाही. आम्हाला शक्यतो शिंदे गटाएवढ्या जागा द्या, एवढाच काय तो आमचा आग्रह पहिल्यापासून आहे. महायुतीचे जास्तीत जास्त खासदार निवडून गेले पाहिजे हा उद्देश आहे.
शिवसैनिकांनी अस्वस्थ होऊ नये….
शिवसैनिकांनी अस्वस्थ होण्याचे कारण नाही, मी पण तुमच्यामधूनच इथपर्यंत आलो आहे. नाराज व्हायचे काम नाही, मुख्यमंत्र्याकडे अनेक खाते आहेत, कामांच्या बाबतीत त्यांना भेटलो, काही वेळातच बाहेर आलो. कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही. दोन पक्षात भांडणे आहेत असे काही मी मानत नाही, प्रत्येकाला पक्षासाठी प्रयत्न करावे लागतात. तिन्ही बाजुचे प्रयत्न सुरु आहेत.
जर तर च्या प्रश्नाला राजकारणात उत्तर नसते. नाशिक आमच्याकडे आलं पाहिजे, मग अनेक लोक उमेदवारी करु शकता, एकमताने निर्णय होईल. पण त्यासाठी आधी जागा सुटने महत्वाचे असल्याचे भुजबळ म्हणाले.
हेही वाचा :