तीन थेंबांची गोष्ट
पाण्याचे तीन थेंब मेघराजाचा निरोप घेऊन पृथ्वीवर यायला निघाले. गप्पा मारता मारता पहिला थेंब म्हणाला, ‘मी जिथे पडेन, तिथे पडेन. जसं नशिबात असेल, तसं होईल.’आपल्या मनातला इरादा बोलून दाखविताना दुसरा थेंब म्हणाला, ‘मी अशा ठिकाणी जाईन जिथे माझं सौंदर्य सगळ्यांच्या नजरेत भरेल.’ तिसरा थेंब क्षणभर विचार करून म्हणाला, ‘मी ठरवलंय की असं नियोजन करायचं; ज्यामुळे माझ्या आयुष्याचा मला आणि इतरांनाही उपयोग होईल.’
प्रवास संपता संपता पहिला थेंब एका भट्टीतल्या तापलेल्या लोखंडावर पडला, तत्काळ वाफ होऊन हवेत विरून गेला. दुसरा थेंब कमळाच्या पानावर पडला. सूर्यप्रकाशात चमचमणारा तो थेंब आवडला सगळ्यांना; पण थोड्याच वेळात पानावरून घरंगळून पडला आणि क्षणार्धात नष्ट होऊन गेला. तिसरा थेंब मात्र पहिल्या दोन्ही थेंबांपेक्षा वेगळा ठरला. वार्याची दिशा, समुद्र इत्यादींचा अंदाज घेत घेत प्रवास करत करत तो तिसरा थेंब निघाला आणि एका शिंपल्यात जाऊन अलगद पडला. काही काळानंतर त्या थेंबाचा सुरेख मोती झाला.
या गोष्टीचं तात्पर्य असं की, नशिबाच्या भरवशावर सगळं सोडून किंवा ‘जे होईल ते होईल’ अशी वृत्ती बाळगत पुढे जाण्यापेक्षा नियोजनाची कास धरत ‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणत पुढे जाणं केव्हाही चांगलं. कारण पाण्याचा पहिला किंवा दुसरा थेंब होण्यापेक्षा सुंदर मोत्यात रूपांतरित झालेला पाण्याचा तिसरा थेंब व्हायलाच आपल्याला आवडेल, नाही का?