फाईव्ह-जी आणि करिअर संधी, कोणते कौशल्य गरजेचे? | पुढारी

फाईव्ह-जी आणि करिअर संधी, कोणते कौशल्य गरजेचे?

जागतिक पटलावर भारत एक स्मार्ट, सुरक्षित आणि स्वदेशी निर्मिती करणारा देश या रूपात पुढे येत आहे. भारताची घोडदौड बघता येत्या काळात 5-जीचा पूर्ण क्षमतेने लाभ घेण्यासाठी 2025 पर्यंत 22 दशलक्ष किंवा 2.2 कोटी कुशल मनुष्यबळाची गरज भासेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.

सध्याच्या काळात वैद्यकीय, शिक्षण, व्यवसाय, वाहतूक आणि दळणवळण, विमा आणि बँकिंग यांसारखे जवळपास सर्वच मोठमोठे क्षेत्र इंटरनेटवर अवलंबून आहेत. समाजातील प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीपर्यंत सुरक्षित आणि विश्वसनीय इंटरनेट पोहोचवणे खूपच गरजेचे आहे.

पुढील एक-दोन वर्षांत हाय स्पीड इंटरनेट फाईव्ह-जी, आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, कॉम्प्युटर व्हिजन, इंडस्ट्रियल आयओटी, ऑटोमेशन आणि रोबोटिक्स यांसारखे तंत्रज्ञान लोकांना विचार करणे, राहणीमान तसेच कमाई करण्यापर्यंतच्या सर्व गरजांना पूर्णपणे बदलण्याचे काम करेल. या कारणास्तव तरुणवर्गाने शक्य तितक्या लवकर वरीलपैकी किमान एका तंत्रज्ञानाचे कौशल्य हस्तगत करणे आवश्यक आहे.

भारत सरकारने चालू 2022 यावर्षी प्रमुख शहरांमध्ये 5-जी इंटरनेट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्या घोषणेची अंमलबजावणी आतापासूनच सुरू केली आहे. या माध्यमातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

काय आहे 5-जी?

फाईव्ह-जी सेल्युलर नेटवर्कची पाचवी पिढी आहे. फोर-जीपेक्षा 100 पट अधिक वेगवान आहे. फाईव्ह-जी लोकांसाठी आणि व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात संधी निर्माण करणार आहे, जे याअगोदर कधीही शक्य झाले नाही. जलद कनेक्टिव्हिटी वेग, अल्ट्रा-लो लेटेसी आणि अधिक बँडविड्थ उद्योगात ऑटोमेट (स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग) करण्यापासून ई-स्वास्थ्य, कनेक्टेड वाहने आणि ट्रॅफिक सिस्टम आणि मोबाईल, क्लाऊड आणि गेमिंगसारख्या सेवांना नजिकच्या भविष्यात स्वयंचलित बनवण्याची क्षमता फाईव्ह-जीमध्ये असेल, हेच त्याचे खास वैशिष्ट्ये सांगता येईल.

रोजगाराच्या संधी

वर्ष 2030 पर्यंत फाईव्ह-जी तंत्रज्ञानाचे जीडीपीतील योगदान 42 अब्ज इतके असेल, असा अंदाज आहे. अशा वेळी जर एआय, एमएल, क्लाऊड आणि इंडस्ट्रियल आयओटीसारख्या नव्या युगातील तंत्रज्ञानाला आत्मसात करण्यावर लक्ष केंद्रित करीत असाल तर ते व्यावसायिक स्वरूपात तुमच्या करिअरला शंभर टक्के साहाय्यभूत ठरेल आणि तुमचे भविष्य उज्ज्वल करेल.

कोणते कौशल्य गरजेचे आहे?

डोमेनमध्ये आपली योग्यता सिद्ध करावी लागेल. यासाठी प्रोग्रॅमिंग कौशल्य जसे- जावा, पायथन, एमएसएसक्यूएल, सुरक्षा वास्तुकला डिझाईन, एआय आणि मशिन लर्निंग भाषा, नेटवर्क आर्किटेक्चर डिझाईन, नेटवर्क आर्किटेक्चरची देखभाल, सिस्टमला तयार करणे, समस्या निवारण आणि अपग्रेड करण्याची क्षमता, बिग डेटा अ‍ॅनालिटिक्स, क्लाऊड कॉम्प्युटिंग, आयओटी या सर्वांविषयीचे ज्ञान आणि कौशल्य गरजेचे आहे.

राष्ट्रीय दूरसंचार कौशल्य संस्थेच्या मते, भारताला 5-जी चा पूर्ण क्षमतेने लाभ घेण्यासाठी 2025 पर्यंत 22 मिलियन किंवा 2.2 कोटी कुशल मनुष्यबळाची गरज भासेल. टेलिकॉम सेक्टर स्किल कौन्सिल (टीएसएससी) द्वारे केलेल्या एका अभ्यासानुसार, 2025 पर्यंत भारतामध्ये 5-जी तंत्रज्ञानात 22 दशलक्ष कुशल मनुष्यबळाची आणि कुशल व्यावसायिकांची गरज भासेल. 5-जी तंत्रज्ञान लाँचिंगनंतर जवळपास 40 ते 50 दशलक्ष ग्राहक याच्याशी जोडले जाऊ शकतात. या मोठ्या संख्येच्या ग्राहकांना सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता भासणार आहे.

राधिका बिवलकर

Back to top button