राज्यात कोरोनाचे नवीन ३५० रुग्ण; रुग्ण संख्या २६८४ | पुढारी

राज्यात कोरोनाचे नवीन ३५० रुग्ण; रुग्ण संख्या २६८४

मुंबई :  पुढारी वृत्तसेवा

राज्यात आज कोरोनाच्या ३५० नवीन रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या २६८४ झाली आहे. कोरोनाबाधित २५९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात २२४७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४६ हजार ५८८ नमुन्यांपैकी ४२ हजार ८०८ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर २६८४ जण पॉझिटिव्ह आले आहेत.आजपर्यंत राज्यातून २५९ कोरोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे. 

सध्या राज्यात ६७ हजार ७०१ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ५,६४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. यातील ७५५ रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी ५० जण करोना बाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये ८, यवतमाळ येथे ७, बुलढाणा जिल्ह्यात ६ , मुंबईत १४ तर प्रत्येकी २ जण पुणे ,पिंपरी चिंचवड, नागपूर मनपा आणि अहमदनगर भागातील आहेत तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर, हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील ६ जण अहमदनगर येथे तर १ जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत. 

दरम्यान, आज राज्यात १८ करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता १७८ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे ११, पुण्यातील ४ तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. एक मृत्यू राज्याबाहेरील नागरिकाचा आहे. 

आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरुष तर ७ महिला आहेत. त्यातील ५ जण हे ६० वर्षांवरील आहेत ११ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत. तर दोघेजण ४० वर्षाखालील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या १८ जणांपैकी १३ रुग्णांमध्ये ( ७२ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. या रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता. 

Back to top button