दिंडोरी (जि. नाशिक); पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे असलेले वाघाड धरण १०० टक्के भरले आहे. सांडव्यातून पाणी पडण्यास सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पाहण्यास मिळत आहे.
वाघाड धरण कालव्यामुळे तालुक्यातील काही परिसर सुजलाम सुफलाम होण्यास मदत होत आहे. त्यामुळे हे धरण भरल्यास शेतकरी वर्गामध्ये वेगळाच आनंद असतो.
तसेच पालखेड धरण ९६.४८ भरले असून पुणेगाव धरणाचा पाणीसाठा ९३.७४ टक्के झाला आहे. पुणेगाव धरणातून उनंदा नदी पाण्याचा विसंर्ग चालू आहे. तर तालुक्यातील सर्वात मोठे करंजवण धरण ६०.१२ टक्के भरले आहे.
ओझरखेड धरण हळूहळू ४४.२७ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. तर तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचे असलेले तिसगाव धरण केवळ २७.६९ टक्के भरल्यामुळे शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे.