सातारा पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील जांबळी-जोर हे दुर्गम खोरे म्हणून ओळखले जाते. भूस्खल झाल्यानंतर याठिकाणची परिस्थिती विदारक बनली असून सुमारे 45 गावं, वाड्या-वस्त्या भेदरलेल्या आहेत. रस्ते व त्यावरील पूल वाहून गेल्याने रहदारी ठप्प झाली आहे.
शेतीचा नकाशा बदलला असून भाताची जागा दगड, धोंड्यांनी घेतली आहे. वगळीची जागा ओढ्यांनी घेतली आहे. ओढ्याची जागा जणू नद्यांनी घेतल्यासारखी पात्रं फुगली आहेत.
नैसर्गिक आपत्ती सोबत रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण अनेक गावांचे पाचगणी व महाबळेश्वर येथे दूध विक्रीसह इतर जोड व्यवसाय करण्याचे दोरच कापले आहेत. यामुळे आर्थिक विवंचणा आ वासून आहे. गोळेवाडी व गोळेगाव या गावांना तर भूस्खलनाने अक्षरश: वेढा टाकल्याने दगड, धोंड्याचा पूर आल्याने ग्रामस्थांच्या पोटात आजही गोळा येत आहे.
गोळेगाव व गोळेवाडीची शिव रांजना ओढ्यावर आहे. याच ठिकाणी सर्वाधिक मोठा धोका निर्माण झाला आहे. हा ओढा मुळ 5 फुट लांबीपर्यंत आहे. मात्र बेभान पाऊस व भूस्खलन यामुळे हा ओढा तब्बल 55 फुट लांबीचा झाला आहे.