प्रभाग क्रमांक 24 कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल
कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल-केईएम हॉस्पिटल या प्रभागात (क्र.24) शहरातील सर्वांत जुन्या आणि ऐतिहासिक भागाचा समावेश आहे. परिसरात आजही पुण्याचे पारंपरिक स्वरूप टिकून असले, तरी कालांतराने वाढलेल्या नागरीकरणामुळे रहिवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अरुंद रस्ते, वाहतूक कोंडी, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन, अनियमित पाणीपुरवठा आणि जुन्या वाड्यांच्या ठप्प झालेल्या पुनर्विकासामुळे या प्रभागाच्या विकासाचा वेग मंदावला आहे.
प्रज्ञा केळकर-सिंग
महापालिकेच्या निवडणुकांत दरवेळी राजकीय पक्षांच्या प्रभागातील समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले जाते. मात्र, त्यांची अंमलबजावणी फारशी झालेली दिसत नसल्याची खंत प्रभागातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे. कसबा आणि रास्ता पेठ परिसरात अनियमित पाणीपुरवठा होत आहे. या भागातील बहुतेक जलवाहिन्या जुन्या असून, त्यांची क्षमता सध्याच्या लोकसंख्येच्या गरजांनुसार अत्यल्प आहे. काही गल्ल्यांमध्ये कमी दाबाने पाणी येते,
तर काही ठिकाणी विस्कळीत पाणीपुरवठा होतो. जलवाहिन्या नादुरुस्त होत असल्यामुळे वारंवार दुरुस्तीची कामे करावी लागत आहेत. परिणामी नागरिकांची गैरसोय होत आहे. जुन्या वाहिन्या बदलण्याचे काम काही भागात अद्यापही अपूर्ण आहे. जेथे हे काम झाले आहे तेथेही नव्या जोडण्या व्यवस्थित न झाल्याने गळती आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. तसेच अनेक घरांमध्ये अजूनही पाणी खेचण्यासाठी मोटारीचा वापर केला जात आहे.
दरवर्षी पावसाळ्यात सकल भागात पाणी तुंबत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. अरुंद रस्त्यांमुळे पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत आहे. सांडपाणी वाहिन्यांची साफसफाई वेळेवर होत नसल्याने त्या वारंवार तुंबत असल्याने दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यांवर वाहत असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही भागातील सांडपाणी वाहिन्या जुन्या झाल्या असून, त्या बदलण्यासह कायमस्वरूपी उपाययोजना करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. या प्रभागातील बाजारपेठेत दररोज नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने रस्ते नेहमीच गजबजलेले असतात. अरुंद रस्त्यांवरून एकाच वेळी दोन चारचाकी वाहने जाणे अवघड असल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पथारीसह इतर व्यावसायिकांची अतिक्रमणे आणि अनधिकृत पार्किंगमुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. प्रभागात कचऱ्याची समस्याही एक गंभीर समस्या आहे. रस्ते अरुंद असल्यामुळे कचरा संकलन करणारी वाहने काही भागात पोहोचू शकत नाहीत. परिणामी काही गल्ल्यांमध्ये कचरा साचून राहतो. काही भागात रात्री उशिरा कचरा संकलन होत असल्याने दुर्गंधी आणि डासांची समस्या वाढत आहे.
प्रभागातील नागरिकांसाठी कमला नेहरू रुग्णालय हे प्रमुख सरकारी आरोग्य केंद्र आहे. मात्र, या रुग्णालयात रुग्णसंख्या खूप मोठी असून मनुष्यबळ आणि सुविधा मर्यादित आहेत. परिणामी, उपचारासाठी आलेल्या रुग्णांना दीर्घ प्रतीक्षा करावी लागते. झोपडपट्ट्यांतील रहिवाशांना प्राथमिक आरोग्य सुविधा अपुऱ्या आहेत. या भागातील पदपथांची अवस्था अतिशय वाईट आहे. पदपथांवर पथारी व्यावसायिक, हातगाड्यांचे अतिक्रमण झाले आहे. तसेच वाहनांचे पार्किंगही केले जात असल्याने पदपथांवरून चालणे पदाचाऱ्यांना अवघड झाले आहे. त्यामुळे अपघातांच्या घटना वाढत आहेत. प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाईचा केवळ फार्स केला जात आहे. परिणामी कारवाईनंतर काही दिवसांनी परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’ होत आहे. गेल्या अनेक दशकांपासून हेच प्रश्न निवडणुकांपूर्वी चर्चेत येतात आणि निवडणुकीनंतर विसरले जातात. विकास आराखड्यात या प्रभागाला आवश्यक ते प्राधान्य मिळत नसल्यामुळे जुन्या पुण्यातील जुने प्रश्न अजूनही कायम असल्याची खंतही नागरिक व्यक्त करीत आहेत.
कसबा पेठ, सोमवार पेठ आणि मंगळवार पेठ या प्रभागातील कागदी पुराचा भाग वगळून नव्याने पद्मजी पार्क, न्यू रास्ता पेठ, न्यू नाना पेठ हा भाग जोडून प्रभाग क्रमांक 24 नव्याने तयार करण्यात आला आहे. या प्रभागात कसबा पेठ, सोमवार पेठ, रास्ता पेठ, गणेश पेठ, नाना पेठ आणि पद्मजी पार्क पर्यंतच्या भागाचा समावेश आहे.
अनियमित पाणीपुरवठा
ड्रेनेज व्यवस्थेतील त्रुटी
वाहतूक कोंडी आणि अनधिकृत पार्किंग
कचरा व्यवस्थापन, स्वच्छतेचा अभाव
जुन्या वाड्यांचा पुनर्विकास ठप्प
रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे
कमला नेहरू रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू
कसबा पेठ येथील मेट्रो स्टेशन कार्यान्वित
मुख्या आणि अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण
अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज
कचरा संकलनासाठी वाहने नियमितपणे येण्यास सुरुवात
जुन्या वाड्यांचा पुनर्विकास ठप्प
या प्रभागाची ओळखच जुन्या वाड्यांसाठी आहे. मात्र, त्यापैकी अनेक वाडे आज धोकादायक अवस्थेत असून, तरीही रहिवासी तिथेच राहात आहेत. पुनर्विकास प्रक्रियेत रहिवाशांमधील मतभेद, मालकी हक्कांचे वाद आणि विकसकांशी असलेले करारातील अडथळ्यांमुळे अनेक प्रकल्प रखडले आहेत. यात स्थानिक प्रशासन आणि बांधकाम विभागातील समन्वयाचा अभाव ही मोठी अडचण ठरत आहे. काही नागरिकांना स्थलांतराची भीती वाटते, तर काहींना नवीन इमारतीतील हक्कांविषयी शंका आहे. परिणामी, वाड्यांच्या पुनर्विकासाचे काम अद्यापही अपूर्ण आहे.
पूर्वी मंगळवार पेठ, जुना बाजार या भागात कचऱ्याची समस्या होती. या भागातील कचरा आता नियमितपणे उचलला जाऊ लागला आहे. या प्रभागात मध्यमवर्गीय, तसेच आर्थिक निम्न स्तरातील नागरिकही राहतात. त्यांना कर्करोग, ह्रदयरोग, किडनीच्या आजारासाठी शहरी गरीब योजनेची मर्यादा वाढवण्यासाठी स्थायी समितीने निर्णय घेतला आणि यासाठी मर्यादा एक लाख रुपयांवरून दोन लाख रुपये केली आहे. शहरातील सर्वच नागरिकांना या योजनेचा लाभ मिळत आहे. तसेच प्रभागात विविध विकासकामे केली आहेत.योगेश समेळ, माजी नगरसेवक
कमला नेहरू रुग्णालयात डायलिसिस सेंटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. डॉक्टरांचा तुटवडा असल्यामुळे डायलिसिस नियमितपणे होत नव्हते. पाठपुरावा केल्याने हे सेंटर नियमित सुरू झाले आहे. ‘एनआयसीयू’मधील बेड वाढवण्यासाठीही प्रयत्न केले. वाड्यांतील रहिवाशांचे पुनर्वसन, जुन्या जलवाहिन्या बदलण्यासह विविध विकासकामे केली आहेत.पल्लवी जावळे, माजी नगरसेविका
प्रभागात जुन्या वाड्यांचा पुनर्विकास, पाणीपुरवठ्यासह विविध समस्या आहेत. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून प्रभागरचना बदलल्याने नागरिकांची अडचण होण्याची शक्यता आहे. त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून नागरी समस्या सोडवण्यासाठी प्रणव धंगेकर पुढाकार घेत आहेत.रवींद्र धंगेकर, माजी नगरसेवक
रास्ता पेठेत पाण्याची समस्या नित्याची झाली आहे. आठवड्यातून दोनदा तरी पुरवठा खंडित होत आहे. निवडणुकीत सर्व उमेदवार पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देतात, पण निवडणूक झाल्यानंतर प्रत्यक्षात काहीच बदल होत नाहीत.संदीप कांबळे, रहिवासी
पावसाळ्यात पाणी साचत असल्याने रस्त्यावरून चालणेही कठीण होत आहे. अनेकदा सांडपाणी आणि पावसाचे पाणी एकत्र वाहते. स्वच्छतेसाठी कर्मचारी येतात. मात्र, कामांमध्ये नियमितता दिसत नाही.मधुरा जोशी, व्यावसायिक
जुन्या वाड्यांचा पुनर्विकास होणे गरजेचे आहे. अनेक इमारती धोकादायक झाल्या आहेत. तरीही प्रशासनाकडून काहीच हालचाल होताना दिसत नाही. प्रशासन आणि राजकीय नेत्यांच्या ओढाताणीत नागरिकांची ससेहोलपट होत आहे.गजानन पवळे, रहिवासी
अरुंद रस्ते आणि पार्किंगचा गोंधळ हा मुख्य प्रश्न आहे. परिणामी सकाळपासून संध्याकाळपर्यंत वाहतूक कोंडी होते. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी समन्वयाने याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे.शुभदा पवार, रहिवासी