सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा : कोयना धरणातून जादा ५०० क्युसेक्स पाणी सोडले | पुढारी

सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा : कोयना धरणातून जादा ५०० क्युसेक्स पाणी सोडले

विटा : पुढारी वृत्तसेवा : कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या व्यवस्थापनाबाबत सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सुहास बाबर यांनी सातारचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे अभ्यासपूर्ण भूमिका आज (दि.२०) मांडली. जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी कोयना धरणातून जादा ५०० क्युसेस पाणी सोडण्याची मागणी बाबर यांनी केली. त्यावर मंत्री देसाई यांनी कोयना धरणातून जादा ५०० क्यूसेस तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश दिले. आज दुपारपासूनच कोयनेतून पाणी सोडण्यात आले आहे, असे बाबर यांनी सांगितले.

आज मुंबई येथे बाबर यांनी मंत्री देसाई यांची भेट घेतली कोयना धरणातून सांगली जिल्ह्याला मिळणाऱ्या पाण्यासंदर्भात त्यांनी देसाई यांच्याकडे सविस्तर भूमिका मांडली. यावेळी विटानगर परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अमोल बाबर, युवक नेते प्रकाश बागल, मिथुन सगरे उपस्थित होते. यावेळी सुहास बाबर यांनी देसाई यांना निवेदन दिले.

सुहास बाबर म्हणाले की, सांगली, सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरलेल्या टेंभू, ताकारी व म्हैसाळ योजनांसाठी कोयना धरणातून कृष्णा नदीमध्ये पाणी सोडले जाते. कोयना धरण या योजनांसाठी व पर्यायाने या भागासाठी वरदान ठरले आहे. सध्या या योजनांचे आवर्तन सुरु असून कमी पर्जन्यवृष्टीमुळे निर्माण होणारी पाणी टंचाई दूर होऊन दुष्काळाची तीव्रता कमी होत आहे. सध्या कोयना धरणातून २ हजार १०० क्युसेक पाणी सोडले जाते. त्यापैकी कोयणा धरण ते कराडपर्यंत उपसा योजना व कारखाने इत्यादीकडून ५०० क्युसेक पाण्याचा वापर होतो. त्यापुढे टेंभू योजनेसाठी एक हजार क्युसेक्स व ताकारी योजनेसाठी ५०० क्युसेक्स असे एकूण दोन हजार क्युसेक्स पाणी उपसा केला जात आहे.

परंतु, यामुळे ताकारी योजनेपासून सांगलीपर्यंत कृष्णा नदी कोरडी पडलेली आहे. त्यामुळे पाणी टंचाई निर्माण होऊन तासगाव, पलूस, सांगली, मिरज आदी शहरांच्या पाणी पुरवठा योजना बंद पडू लागल्या आहेत. त्यामुळे कोयना धरणातून जादा ५०० क्युसेक पाणी सोडल्यास ही पाणी टंचाई दूर होईल. तरी कोयना धरण पायथा व्हॉल्वमधून ५०० क्युसेक जादा पाणी सोडण्याबाबत तत्काळ निर्णय व्हावा, अशी मागणी करण्यात आली. यावर देसाई यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कोयना धरणातून जादा ५०० क्युसेस पाणी सोडण्याचा आदेश दिले. दुपारपासून हे पाणी सोडण्यात आले. यावर्षीची पर्जन्यमान कमी असल्याने धरणातील पाणीसाठा व पुढे निर्माण होणारी पाणी टंचाई याबाबत आपण सातत्याने लक्ष ठेवून असून याबाबत योग्य व्यवस्थापन व्हावे, यासाठी या प्रश्नी आपण सातत्याने पाठपुरावा करत राहू, असेही बाबर यांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button