आठवड्यात पाऊस झाला नाही, तर धरणांतून पाणी सोडा : दीपक केसरकर
कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आठवड्यात पाऊस झाला नाही, तर शेतीसाठी दूधगंगासह अन्य धरणांतून पाणी सोडा, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी (दि. 8) कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत केली. पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत केसरकर म्हणाले, यावर्षी खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांसाठी पाण्याची मागणी होत आहे. हवामानाचा अंदाज घेऊन येत्या 8 दिवसांत आवर्तन द्या. दूधगंगेची गळती व दुरुस्ती प्रस्तावाच्या मंजुरीबाबत उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत चर्चा करू. बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी ‘डीपीडीसी’तून निधी देऊ. पूर नियंत्रणासाठी नद्यांतील गाळ काढून खोलीकरण करा. राजाराम बंधार्याप्रमाणे अन्य बंधार्यांना टप्प्याटप्प्याने बरगे बसवा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
दूधगंगा धरणाची गळती, पाणीसाठा, पाणी मागणीबाबत अहवाल द्या, पाण्याच्या पुनर्वापराचे नियोजन करा. चिकोत्रा, नागणवाडी व आंबेओहोळ पाणी नियोजनाची तातडीने बैठक घ्या, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्या.
कर्नाटकात जाणारे अतिरिक्त पाणी रोखण्यासाठी शिरोळ तालुक्यात कालव्याची कामे पूर्ण करा, असे खासदार धैर्यशील माने यांनी सांगितले. बंधार्यांची दुरुस्ती करा. पिकांचे नुकसान होऊ नये, यासाठी पाण्याचे आवर्तन सोडा, असे आवाहन आ. सतेज पाटील यांनी केले. जलसंपदाचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे यांनी सादरीकरण केले.
बैठकीला आमदार पी. एन. पाटील, आ. जयंत आसगावकर, समरजित घाटगे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. के. मंजुलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील आदींसह अधिकारी उपस्थित होते.