माझ्या मतदारसंघात दादागिरी खपवून घेणार नाही ; खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा | पुढारी

माझ्या मतदारसंघात दादागिरी खपवून घेणार नाही ; खासदार सुप्रिया सुळे यांचा इशारा

हिंजवडी : माझ्या बारामती लोकसभा मतदार संघात कुणीही दादागिरी केलेली मी खपवून घेणार नाही, असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांना दिला. माण येथे माण पंचायत समिती गणाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, या वेळी त्या बोलत होत्या. रिहे ग्रामस्थांनी या वेळी गावातील एका प्लॉटमध्ये काही नागरिकांनी गुंतवणूक करून सोसायटी तयार केली आहे. आपल्या स्वप्नातल्या घराची नोंदणी करण्यासाठी अनेकदा प्रयत्न करूनदेखील मुळशी तालुक्यातील गटविकास अधिकारी सदर नोंदणी होऊ देत नाहीत. त्यामुळे ही नोंदणी रखडलेली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

अधिकार्‍यांना दिली तंबी
यावर खा. सुळे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना तात्काळ या संबंधी तंबी दिली. यासह येथील नियामत होणार्‍या कामांना रोखणार्‍या अधिकारी आणि राजकीय नेत्यांचा त्रास होत असल्यास थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच, पुनवळे, ताथवडे, जांबे, नेरे, कासारसाई, हिंजवडी येथील नागरिकांनी महामार्ग क्रमांक 4 च्या बाबत विविध मागण्या केल्या आहेत. यात पुनवळे येथील रास्ता, उड्डाणपूल अशा मागण्या होत्या. त्याबाबत संबंधित अधिकार्‍यांशी चर्चा करण्याचे अश्वासन त्यांनी दिले. या वेळी घोटावडे,चांदे, नांदे, रिहे, जवळ, कातरखडक, पिंपळोली, आंधळे, माण येथील विविध समस्या त्यांनी समजून घेतल्या. पुणे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, ज्येष्ठ नेते राजाभाऊ हगवणे, तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, सभापती पांडुरंग ओझरकर, सागर साखरे, सुरेश हुलावळे, बाबाजी शेळके, गणपत जगताप आदी उपस्थित होते.

फेज 2 व फेज 3 साठी माण असा उल्लेख करा
माण ग्रामपंचायतच्या पदाधिकार्‍यांनी या वेळी सांगितले, की माण गावातील सुमारे 68 टक्के जमीन एमआयडीसीने संपादित केली आहे. मात्र, आयटी पार्कला हिंजवडी असा सर्रास उल्लेख केला जातो. हा स्थनिक नागरिकांच्या अस्मितेचा प्रश्न आहे. अनेक बांधकाम व्यावसायिक, हॉटेल चालक आणि इतर संस्था असा उल्लेख करतात. या वेळी सुळे म्हणाल्या, की यापुढे फेज 1 साठी हिंजवडी तर फेज 2 व फेज 3 साठी माण असा उल्लेख करणे स्पोईस्कर ठरेल. यासाठी ग्रामपंचायत ने पुढाकार घ्यावा. संबंधित आस्थापणास पत्र द्यावे वेळ आल्यास जिल्हाधिकार्‍यांनादेखील याबाबत निवेदन द्यावे.

Back to top button