श्रीगोंदा : सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ | पुढारी

श्रीगोंदा : सरकारला जागे करण्यासाठी जागरण गोंधळ

श्रीगोंदा; पुढारी वृत्तसेवा : काल श्रीगोंदा तहसील कार्यालयात झोपलेले सरकार, निष्किय राज्यकर्ते, कारखानदार, तसेच तालुक्यातील निष्क्रिय, मुजोर अधिकारी यांचे डोके ठिकाण्यावर आणून,त्यांना देवा खंडेरायाने योग्य सद् बुद्धी द्यावी व झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी राजेंद्र म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्यात आला.

शेतीपंपाची सक्तीची वीजबिल वसुली बंद करावी.ओल्या दुष्काळामुळे नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना नुकसान भरपाई म्हणून 50 हजार रुपये मदत मिळावी. श्रीगोंदा तालुक्यातील चारही साखर कारखान्यांनी उसाचा पहिला हप्ता किमान 3100 रुपये द्यावा. पंचायत समिती कार्यालयात गायगोठा अनुदानासाठी शेतकर्‍यांची होणारी आर्थिक पिळवणूक थांबवण्यात यावी. लम्पी आजाराने दगावलेल्या जनावरांची नुकसान भरपाई मिळावी. जनावरांचे सर्व आठवडे बाजार सुरू करण्यात यावे.या सर्व मागण्यासाठी हे अनोखे आंदोलन तहसील कार्यालयासमोर करण्यात आले.

यावेळी शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के म्हणाले, शेतकर्‍यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच संघर्ष करावा लागतो. दरवेळी आंदोलने करावी लागतात. मोर्चा, आंदोलने,उपोषणे करून देखीलही प्रशासनाला घाम फुटत नाही, म्हणून या झोपलेल्या प्रशासनाला जागा करण्याकरिता व यांना योग्य सद्बुद्धी मिळण्याकरिता आज तहसील कार्यालयासमोर देवा खंडेरायाचा जागरण गोंधळाचा कार्यक्रम करण्याची वेळ आली.

या अनोख्या आंदोलनाची दखल घेत तहसीलदार कुलथे, गटविकास अधिकारी डॉ.राम जगताप ,महावितरणचे सर्व अधिकारी हे आंदोलन आंदोलन स्थळी उपस्थित होते.रोहित्रे न सोडता वसुली करू, पंचायत समितीच्या निगडित प्रश्नांसंदर्भात लवकरच आढावा बैठक घेऊ. असे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.यावेळी तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

…तर गाढव मोर्चा काढणार!
आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. आठ दिवसांत प्रश्न मार्गी लागले नाही, तर संबंधित कार्यालयात गाढवं सोडून आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के यांनी दिला

Back to top button