रत्नागिरी : खतासाठी कृषी विभाग लागला कामाला | पुढारी

रत्नागिरी : खतासाठी कृषी विभाग लागला कामाला

रत्नागिरी; पुढारी वृत्तसेवा : सध्या पावसाळ्याला दोन महिने शिल्लक असले तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे खरीप हंगामासाठी लागणार्‍या खताचा तुटवडा आणि किमती वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाकडून आतापासूनच नियोजन सुरू झाले आहे. जिल्ह्यासाठी 22 हजार मेट्रिक टन खताची मागणी केली असून 14 हजार 600 मेट्रिक टन मंजूर झाले आहे. येत्या दोन दिवसांत कोकण रेल्वे किंवा महामार्गावरून ट्रकद्वारे खत दाखल होणार आहे. तुलनेत वीस दिवस आधी खताची व्यवस्था केली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात भातशेतीसह आंबा बागायतदारांना खताची मोठी गरज भासते. मोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर त्वरित भातशेतीची कामे हाती घेण्यात येतात. काही जण मे महिन्याच्या अखेरीस पावसाचा अंदाज घेऊन तर काही शेतकरी जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी करतात. यंदा रशिया-युक्रेन युद्ध झाल्यामुळे खताचा तुटवडा जाणवण्याची भीती वर्तविली जात आहे. खतांच्या किमतीही वाढू शकतात. सध्या शासनाकडून सबसीडी असल्यामुळे किमती स्थिर आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यात भाताचे 68 हजार हेक्टर तर आंब्याचे 70 हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी 22 हजार मेट्रिक टन खताची मागणी जिल्हा कृषी विभागाने नोंदवली आहे. 2020-21 ला 14 हजार 573 मे. टन खत वापरले गेले होते. 2022-23 या वर्षासाठी 14 हजार 600 मे. टन मंजूर झाले.

अनेकवेळा सहकारी संस्था, सहकारी संघ यांच्याकडून मागणी उशिरा झाल्यामुळे खत उशिरा दाखल होते आणि शेतकर्‍यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होते. हे लक्षात घेऊन दोन महिने आधीच जिल्ह्यातील सहकारी सोसायटी, सहकारी संघ, खत पुरपवठा कंपन्या आणि आरसीएफचे प्रतिनिधी यांची बैठक घेण्यात आली.

तुटवडा जाणवू नये, यासाठी लवकर मागणी नोंदवण्याचे आवाहन केले आहे. ‘आरएसएफ’नेही खत देण्याची तयारी केली आहे. रेल्वेने किंवा रस्ता मार्गे हे खत येइल. त्यानुसार दोन दिवसात खताची वाहतूक सुरू होणार आहे.

खतांची मागणी

खत प्रकार आणि मंजूर(मे. टन)
  • युरीया – 9020  मे. टन
  • डी.ए.पी – 720 मे. टन
  • एम. ओ. पी. – 650 मे. टन
  • एस. एस. पी. -3510 मे. टन
  • एन. पी. के. -740 मे. टन
  • एकूण -14,640 मे. टन

Back to top button