IND vs PAK : T20 विश्वचषकापूर्वी आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने | पुढारी

IND vs PAK : T20 विश्वचषकापूर्वी आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान आमने-सामने

पुढारी ऑनलाईन डेस्क : आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक 2022 च्या तारखा जाहीर केल्या आहेत. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे देण्यात आले आहे. T20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी होणारी ही स्पर्धा फक्त T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. पहिला सामना 27 ऑगस्टला, तर अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे. अशा स्थितीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होणार आहे. (IND vs PAK)

आशिया चषक स्पर्धेच्या 15 व्या आवृत्तीत भारतीय संघ आपले विजेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरीचे सामने 20 ऑगस्टपासून सुरू होतील. यापूर्वी ही स्पर्धा सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती, परंतु कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली. यानंतर जून 2021 मध्ये आयोजन करण्याचे ठरले होते, परंतु पुन्हा एकदा कोरोना संसर्गाचा फटका बसला आणि दुसऱ्यांदा ही स्पर्धा पुढे ढकलली. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली असून एजीएमच्या बैठकीत स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (IND vs PAK)

टीम इंडिया हा आशिया कपच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. ही स्पर्धा 1984 मध्ये पहिल्यांदा आयोजित करण्यात आल्यापासून भारताने सात वेळा विजेतेपद पटकावले आहे. भारतीय संघ 1984, 1988, 1990-91, 1995, 2010, 2016 आणि 2018 मध्ये चॅम्पियन ठरला आहे.

दुसरीकडे श्रीलंका पाच विजेतेपदांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. श्रीलंकेने 1986, 1997, 2004, 2008 आणि 2014 मध्ये विजेतेपद पटकावले होते. पाकिस्तानने 2000 आणि 2012 मध्ये ही स्पर्धा जिंकली.

सहा संघ सहभागी होणार..

आशिया कप 2022 मध्ये सहा संघ सहभाग घेतील. ज्यात भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान यांच्यासह एका संघाचा समावेश असेल. सहावा संघ पात्रताफेरीतून निवडला जाईल. यासाठी यूएई, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात पात्रता सामने होणार आहेत.

जय शहा यांचा कार्यकाळात वाढ

दरम्यान, आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष म्हणून बीसीसीआयचे सचिव जय शहा यांचा कार्यकाळ एक वर्षाने एकमताने वाढवण्यात आला आहे. ओमान क्रिकेट बोर्डाचे पंकज खिमजी यांची एसीसीच्या (ACC) उपाध्यक्षपदी आणि मलेशिया क्रिकेट असोसिएशनचे महिंदा वल्लीपुरम यांची विकास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी कोलंबो येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Back to top button