![Antarctica : अंटार्क्टिकातील समुद्री बर्फ नीचांकी पातळीवर](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2023%2F09%2F6-19.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
अंटार्क्टिका : अंटार्क्टिका हा पृथ्वीवरील सात खंडांपैकी एक खंड. हा खंड सर्वात दक्षिणेस वसलेला असून पृथ्वीचा दक्षिण ध्रुवही या खंडावर आहे. हा खंड इतर सर्व खंडांपेक्षा अधिक थंड, कोरडा, प्रचंड वारे वाहत असणारा व सर्वात जास्त सरासरी उंची असणारा खंड आहे. याचा 98 टक्के पृष्ठभाग बर्फाच्छादित आहे. जगभरातील 60 टक्के स्वच्छ पाणी अंटार्क्टिकामध्ये बर्फाच्या रूपात जमा झालेले असते.
संबंधित बातम्या :
असे म्हटले जाते की, अंटार्क्टिकातील बर्फ पूर्णपणे विरघळले तर पृथ्वीवरील महासागरांची जलपातळी 58 मीटरपर्यंत उंचावली जाऊ शकते. यामुळे एक तरी समुद्र किनार्यावर राहणार्या नागरिकांचे जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. शिवाय, पृथ्वीचा नकाशा देखील बदलण्याचा धोका असू शकतो. आता एका नव्या सॅटेलाईट डाटानुसार, अंटार्क्टिकातील समुद्री बर्फ ऐतिहासिक नीचांकी पातळीवर पोहोचले असून ही जगभरातील शास्त्रज्ञ आणि पर्यावरणवाद्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात अहे. ग्लोबल वॉर्मिंगचे सातत्याने फटके बसत असताना आता यापासून अंटाक्टिर्र्काचे हिमनगही बचावलेले नाहीत, असे या डाटावरून दिसून आलेले आहे.
नव्या निरीक्षणानुसार, अंटार्क्टिकातील समुद्री बर्फ आता 17 दशलक्ष चौरस किलोमीटर्सपेक्षा कमी व्याप्तीपुरते मर्यादित राहिले आहे. सप्टेंबरमधील सरासरी पातळीपेक्षा ही आकडेवारी 1.5 दशलक्ष चौरस किलोमीटर्सनी कमी आहे. क्लायमेेट चेंजमुळे पोलर रिजनमध्ये व्यापक फेरबदल होत आहेत, याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
भूपृष्ठीय बर्फ आणि समुद्री बर्फ अशा दोन क्षेत्रातून अंटार्क्टिकातील बर्फ ग्लोबल क्लायमेटचा समतोल राखण्यासाठी अतिशय महत्त्वाचे योगदान देते. उजळ, पांढर्या रंगाचा बर्फ सूर्याची उर्जा वातावरणात परावर्तित करतो. याचवेळी समुद्री बर्फ आईस-अल्बेडो इफेक्टसाठी परिणामकारक ठरते. अंटार्क्टिकामध्ये बर्फ सध्या सर्व ठिकाणी समसमान अजिबात नाही. पश्चिमेकडे बहुतांश हिस्सा पाण्याखाली आहे. अगदी 1990 पासूनच येथील परिस्थिती चिंतेची ठरत आली आहे.
ज्याप्रमाणे बर्फ वितळत जाईल, त्याप्रमाणे समुद्री स्तर वाढत जाईल आणि अशा परिस्थितीत वादळांचे प्रमाण वाढत राहील, अशी ही सर्वसाधारण रचना आहे. आता अंटार्क्टिकातील बर्फ इतक्या वेगाने का वितळत आहे, याची कारणमीमांसा युद्ध पातळीवर केली जात आहे. एकीकडे, विविध घटकांमुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून त्याला वेळीच प्रतिबंध घालण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाऊ शकतात, यावर आता भर दिला जात आहे.
हेही वाचा :