

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा
मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी दि. 26 फेब्रुवारीपासूनखासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषणास बसणार आहेत. आंदोलनास संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक ग्रामपंचायती, सामाजिक संघटना, तालीम संस्थांच्या पाठिंब्याची पत्रे खा. संभाजीराजे यांच्या कार्यालयाकडे जमा होत आहेत.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी पाठबळ म्हणून विविध मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत; मात्र याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ आणि मागण्या त्वरित मान्य करून त्यांची अंमलबजावणी तातडीने व्हावी, यासाठी खासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानात दि. 26 फेब्रुवारीपासून बेमुदत उपोषण करणार आहेत. या आंदोलनाला पाठबळ म्हणून अनेक ग्रामपंचायत, संघटना, तालीम संस्थांमार्फत ग्रामीण, शहर, तालुका, जिल्हा पातळीवर बैठका आयोजन, मेळावे, पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत.
केवळ मराठा समाजच नव्हे, तर बहुजन समाजातील लोकांकडूनही मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतून याबबतची ठराव पत्रे सकल मराठा समाजाकडे पाठविली असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहेत. या पाठिंब्याच्या जोरावर निश्चितपणे मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी हातभार लागणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.