अणदूर : धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यामधील अणदूर व मैलारपूर नळदुर्ग येथील श्री खंडोबाची यात्रेस बुधवारी (दि.१३) सुरुवात होत आहे. गुरुवारी (दि.१४) श्री खंडोबा देव मैलारपूर नळदुर्ग मुक्कामी पाठवले जात आहेत. एक देव, दोन गाव, दोन मंदिरे अशी श्री खंडोबा देवाची लेखी देवाण घेवाण होते. शेकडो वर्षांपासून ही परंपरा आजही चालू आहे. नळराजाची पत्नी दमयंतीच्या भक्तीसाठी नळदुर्ग येथे अवतरलेल्या व श्री बानाई देवी विवाह सोहळ्यामुळे ही यात्रा परिसरात प्रसिद्ध आहे. Dharashiv News
तुळजापूर तालुक्यातील अणदूर व मैलारपुर नळदुर्ग ही दोन गावे आहेत . या दोन गावांमध्ये वेगवेगळी दोन मंदिरे आहेत. मात्र, या दोन्ही गावातील मंदिरात मूर्ती मात्र एकच आहे. अणदूर येथील मंदिरात श्री खंडेरायाची मूर्ती सव्वा दहा महिने वास्तव्यास असते. तर मैलारपूर नळदुर्ग येथील मंदिरात श्री खंडेरायाची मूर्ती पावणे दोन महिने वास्तव्यास असते. या दोन्ही मंदिराचे मुख उत्तरेकडे असून दोन्ही मंदिरातील मंदिराची रचना जवळपास सारखीच आहे. मंदिराच्या बांधकामावरती लिहिलेल्या शिलालेखावरून असे दिसून येते की, मंदिर हे इसवी सन सोळाशे ते सतराशे या शतका मधील असावेत. Dharashiv News
अणदूर येथील देशमुख, कुलकर्णी, पाटील, मानकरी व नळदुर्ग येथील देशमुख, कुलकर्णी, पाटील व मानकरी यांच्या साक्षीने कागदावरती देवाच्या देवाण-घेवाणीचा लेखी करार केला जातो. या करारात असे नमूद केले जाते की, सालाबाद प्रमाणे व रितीरिवाजा प्रमाणे श्री खंडोबा देवास चंपाषष्ठीच्या उत्सवाकरीता मैलारपूर नळदुर्ग येथे घेऊन जात आहोत. चंपाषष्ठीचा उत्सव व पौष पौर्णिमा यात्रेकरीता देवास घेऊन जात आहोत. पौष पौर्णिमा यात्रा संपल्यानंतर पौष नवमीच्या पूजेला अणदूर मुक्कामी पाठवत आहोत, असा करार या दोन्ही गावच्या मानकरांच्या मध्ये स्वाक्षरीने केला जातो. या कराराचे वाचन दोन्ही गावचे मानकरी श्री खंडेरायाच्या समोर करतात. बेल भंडाऱ्याची उधळण करून हा करार श्री खंडेरायाच्या साक्षीने नळदुर्गचे मानकरी अणदूरच्या मानकऱ्यांना देतात. व देव नळदुर्गकरांना दिला जातो. ही परंपरा अनेक शतकापासून चालू असून आजही परंपरा या दोन्ही गावातील मानकरी श्री खंडेरायाच्या साक्षीने पाळतात.
पोष पोर्णिमा यात्रा भरण्यामागची अख्यायिका अशी सांगितली जाते की, श्री खंडोबा व म्हाळसादेवी यांच्या लग्नानंतर त्यांची वरात (छबिना स्वरूपात) काढण्याचा सोहळा म्हणजे पौष पौर्णिमेची यात्रा साजरी करणे होय. मात्र, ही यात्रा परंपरा शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. या दिवशी मैलारपूर येथे मोठी यात्रा भरते. अणदूर मंदिरातून श्रींचे वाहन असलेले दोन अश्व वाजत गाजत मैलारपूर येथे मानाच्या काट्यांसह येतात. येथील जुन्या व नवीन मंदिरास प्रदक्षिणा घालून देवाचा छबिना संपन्न होतो. यात्रेच्या नोंदणीनंतर श्री खंडोबा देव पुन्हा सव्वा दहा महिन्यांसाठी अणदूर मुक्कामी जातात, अशी ही शेकडो वर्षाची परंपरा आजही चालू आहे.
हेही वाचा