बदलत चाललेली शिक्षण पद्धती अंगिकारण्याची तयारी ठेवा : कुलगुरू डॉ. अरुण पाटील | पुढारी

बदलत चाललेली शिक्षण पद्धती अंगिकारण्याची तयारी ठेवा : कुलगुरू डॉ. अरुण पाटील

पुणे; पुढारी वृत्तसेवा : शिक्षण : चांगले भविष्य घडवायचे असेल तर चांगला शिक्षक सहवास लाभला पाहिजे.

आई-वडील, भाऊ यांचे मार्गदर्शनाबरोबरच योग्य दिशा दाखवणारे मित्रदेखील तुमचे भविष्य घडवू शकतात.

बदलत चाललेली शिक्षण पद्धती अंगिकारण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापूरच्या संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण पाटील यांनी व्यक्‍त केले.

संजय घोडावत प्रस्तुत आणि ‘दै. पुढारी आयोजित ‘एज्युदिशा’ या लाईव्ह वेबिनारमध्ये ‘स्वतःला ओळखा स्वतःला घडवा’ या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

दहावी व बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. अरुण पाटील म्हणाले, पालकांनीदेखील प्रोजेक्ट ओरिएंटेड शिक्षण देणार्‍या विद्यापीठ, महाविद्यालयांची निवड करावी.

यामुळे बौद्धिक व सर्वांगीण विकास होऊन बदलत्या काळानुसार कौशल्यधारक विद्यार्थी घडतील.

डॉ. पाटील म्हणाले, आमच्यावेळी तंत्रज्ञान एवढे जवळ आले नव्हते. या तंत्रज्ञानामुळे तुम्हाला स्वतःचे प्रतिबिंब पाहणे शक्य झाले आहे.

जेव्हा स्वतःला ओळखायचा प्रयत्न कराल तेव्हा हार्डवर्कऐवजी स्मार्टवर्क करण्याबरोबरच स्वतःची पार्श्वभूमी ओळखून कोणत्या दिशेने जायचे त्याचे नियोजन केले पाहिजे.

काय म्हणाले, डॉ. अरुण पाटील

मुलांचे आयुष्य घडवण्यासाठी पालक काहीही करायला तयार असतात.

तशीच मुलांची कुवत ओळखण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असल्याने ते योग्य दिशा दाखवू शकतात.

आई-वडील, शिक्षक याबरोबरच मुलांच्या आयुष्यातील मित्रदेखील महत्त्वाचा घटक आहेत. मित्र चांगला रस्ता दाखवून मदत करेल, यासाठी स्वतःवर नियम घातल्यास आपण चांगले घडू शकतो.

शिक्षण घेतल्यावर पदवीचा कागद घेऊन मिरवण्यापेक्षा आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची जिद्द असणे गरजेचे आहे. यासाठी आपल्याकडील विद्यापीठांनी सामंजस्य करार करून कुशल शिक्षणावर आधारित पदवी आता घेता येईल.

मी ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, युकेमध्ये गेलो. तेथे महाविद्यालयात क्‍लासरूम नाही; मात्र तेथील विद्यार्थी शिक्षण घेतात. तेथे प्रोजेक्ट बेस शिक्षण आहे, हेच आता आपण आणत आहोत.

विद्यार्थ्यांनी व पालकांनी अशाच विद्यापीठांची निवड करून आपला मार्ग निवडावा.

स्वप्नासाठी मेहनत घ्या…

कवी जयवंत दळवी यांच्या कवितेचा आधार घेत विद्यार्थांना ते म्हणाले, स्वप्न डोळ्यात तुझ्या रुतले आहे… आणि कवी बा. भ. बोरकर यांच्या देखणे जे चेहरे… कवितेचा संदर्भ देत सांगितले की, नुसतीच स्वप्नं बघण्यापेक्षा ती साकार करण्यासाठी मेहनत घ्या.

स्वतःला ओळखून एकदा दिशा ठरवली की, त्या निर्णयावर ठाम राहून आपले कर्तृत्व दाखवावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Back to top button