

IPL 2025 SRH vs MI Pahalgam Terror Attack Pay Homage To Victims
हैदराबाद : जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे मंगळवारी (दि. 22) झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयने बुधवारी होणाऱ्या आयपीएल सामन्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला. 23 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना सुरू झाला तेव्हा दोन्ही संघांच्या कर्णधारांनी या भ्याड हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवला.
सामना सुरू होण्यापूर्वी मुंबईचा कर्णधार पंड्या आणि हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स टॉससाठी आले. मुंबईने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर दोन्ही कर्णधारांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर आपली प्रतिक्रिया दिली.
पंड्या म्हणाला की, ‘सर्वप्रथम मी दहशतवादी हल्ल्यातील बळींबद्दल शोक व्यक्त करू इच्छितो. आम्ही एक संघ म्हणून आणि एक फ्रँचायझी म्हणून अशा कोणत्याही हल्ल्यांचा निषेध करतो,’ असे सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘टॉस जिंकल्यानतर प्रथम गोलंदाजी करणार आहे. खेळपट्टी चांगला दिसत आहे. आम्ही संघात फक्त एक बदल केला आहे. अश्विनीची जागा विघ्नेश घेईल. खेळ शक्य तितका सोपा करण्याची आमची योजना आहे.’
पॅट कमिन्स म्हणाला, ‘पहलगाम दहशतवादी हल्ला ही आमच्यासाठीही खूप दुःखद गोष्ट आहे. आमच्या संवेदना पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत,’ अशी भावना त्याने व्यक्त केली. संघात एक बदल करण्यात आल्याचेही त्यांने यावेळी सांगितले. मोहम्मद शमीच्या जागी जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले आहे.