

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) टीम इंडियाची घोषणा केली आहे. युवा फलंदाज शुभमन गिलकडे संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले असून, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतचे उपकर्णधार म्हणून संघात पुनरागमन झाले आहे.
भारतीय संघ लवकरच कसोटी क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळला जाईल. बीसीसीआयने या मालिकेसाठी टीम इंडियाचे नुकतेच अंतिम स्वरूप जाहीर केले. या संघात ऋषभ पंतचे पुन्हा एकदा पुनरागमन झाले आहे. तथापि, संपूर्ण चमूत फारसे बदल करण्यात आलेला नाही. संघाची धुरा पुन्हा एकदा शुभमन गिलच्या खांद्यावर असेल आणि ऋषभ पंतकडे उपकर्णधारपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
भारतीय संघाने यापूर्वीची कसोटी मालिका मायदेशात वेस्ट इंडिजविरुद्ध खेळली होती. त्या मालिकेत संघाने अप्रतिम खेळ दाखवला होता. त्याच्या तुलनेत आता संघात दोन बदल करण्यात आले आहेत. इंग्लंड मालिकेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे ऋषभ पंत संघाबाहेर होता. या काळात यष्टिरक्षणाची जबाबदारी ध्रुव जुरेलने सांभाळली होती. तसेच, एन. जगदीशनला राखीव यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळाले होते. आता जगदीशनला वगळण्यात आले असून, त्याच्या जागी पंत संघात परतला आहे. आता यष्टिरक्षणाची पहिली निवड पंतच असेल. ध्रुव जुरेलला फलंदाज म्हणून संघात संधी मिळू शकते.
संघात गोलंदाजी विभागातही एक बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला यावेळी संघातून वगळण्यात आले आहे. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज आकाश दीपला संघात स्थान मिळाले आहे. विशेष म्हणजे, प्रसिद्ध कृष्णा सध्या 'इंडिया ए' संघाचा भाग असल्याने त्याची निवड या संघात करण्यात आलेली नाही. यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही जोडी पुन्हा एकदा सलामीच्या भूमिकेत दिसणार आहे. वेगवान गोलंदाजीची कमान मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांच्यासोबत आकाश दीप सांभाळेल.
मालिकेतील पहिला सामना १४ नोव्हेंबर रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. त्यानंतर दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे होणार आहे. ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असल्याने ती अत्यंत महत्त्वाची असणार आहे. भारतीय संघ सध्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. या मालिकेतील दोन्ही सामने जिंकून आपला 'पीसीटी' वाढवण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.
शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, नितीश कुमार रेड्डी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, आकाश दीप