

U19 World Cup Winner: बीसीसीआयने अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी 7.5 कोटी रुपयांच्या रोख बक्षिसाची घोषणा केली आहे. फायनलमध्ये भारताने इंग्लंडवर 100 धावांनी मात करत सहाव्यांदा हा किताब जिंकला आणि देशभरात आनंदाच वातावरण पाहायला मिळालं.
BCCI चे सचिव देवजित सैकिया यांनी सांगितलं की, “इंग्लंडला हरवून अंडर-19 विश्वचषक जिंकल्यामुळे संपूर्ण देश आनंदात आहे. या ऐतिहासिक यशाबद्दल संघाला 7.5 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याचा निर्णय घेतला आहे.”
आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने आधी फलंदाजी करत 50 षटकांत 9 बाद 411 धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ 311 धावांत गारद झाला.
या सामन्यात वैभव सूर्यवंशीने अफलातून खेळी करत अवघ्या 80 चेंडूंमध्ये 175 धावा ठोकल्या. त्याच्या डावात 15 चौकार आणि 15 षटकारांचा समावेश होता. वैभवच्या या स्फोटक खेळीमुळे भारताला मोठी धावसंख्या उभारता आली.
BCCI ने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मुख्य प्रशिक्षक हृषिकेश कानिटकर आणि त्यांच्या सहकारी स्टाफचं विशेष कौतुक करण्यात आलं आहे. तसंच बोर्डाच्या ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’चे क्रिकेट प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मणच्या मार्गदर्शनाचाही उल्लेख करण्यात आला आहे. त्यांच्या देखरेखीखाली खेळाडू तयार झाले, असं BCCI ने म्हटलं आहे.
दरम्यान, BCCI अध्यक्ष मिथुन मनहास यांनी संघाचं अभिनंदन करत सांगितलं, “सहाव्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकणं ही अभिमानाची गोष्ट आहे. संपूर्ण स्पर्धेत संघाने आत्मविश्वास आणि जिद्द दाखवली. पुरुष आणि महिला दोन्ही अंडर-19 विश्वचषक जिंकणं भारतासाठी मोठं यश आहे.”