![विराट काेहली ( संग्रहित छायाचित्र )](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2022%2F07%2Fvirat-kohli.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
पुढारी ऑनलाईन डेस्क :
इंग्लंड विरुद्धच्या टी-२० मालिकेतील दमदार यशानंतर आता टीम इंडिया वन डे मालिकेसाठी ( IND vs END 1st One Day) सज्ज झाली आहे. तीन वन डे सामन्यातील पहिला सामना आज ( दि. १२) सायंकाळी ५.३० मिनिटांनी सुरु होईल. मात्र या सामन्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढविणारी माहिती समोर आली आहे. विराट कोहली दुखापतग्रस्त असून, आजच्या सामन्यास तो मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
टी-२० मालिकेत विराट कोहली आपल्या नावाला साजेशी कामगिरी करु शकला नाही. मागील काही सामने विराट सातत्याने अपयशी ठरत आहे. आता तो दुखापतग्रस्त असून, उदर आणि जांघ दरम्यान त्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे आजच्या सामन्याला विराटच्या खेळणार का, या प्रश्नाचे उत्तर अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारताने इंग्लंडविरोधात २०१४ मध्ये वन डे मालिका जिंकली होती. आता आठ वर्षानंतर पुन्हा एकदा अशीच कामगिरी
करण्याची संधी टीम इंडियाला आहे. २०१४ मध्ये भारताने वन डे मालिका ३-१ ने जिंकली होती. मात्र २०१८ मध्ये १-२ अशी मालिका गमावली होती. २०१९च्या वन डे विश्वचषक सामन्यातही इंग्लंडने भारताचे पराभव केला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडियासमोर तगडे आव्हान असणार आहे.
टी-२० मालिकेत बेन स्टोक्स, जॉनी बेयरस्टो आणि जो रुट हे इंग्लंडच्या संघात नव्हते. आता वन डे मालिकेत या तिन्ही खेळाडू पुन्हा मैदानात उतरणार आहेत. आज इंग्लंड जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टो सलामीला येवू शकतात. तर कर्णधार जोस बटलर हा मध्यक्रमात फलंदाजी करु शकतो. आजच्या सामन्यासाठी इंग्लंडचा संघ पूर्ण क्षमतेने मैदानात उतरणार असल्याने भारतासमोर मोठे आव्हान असणार आहे.
टीम इंडियाचा सलामीवर शिखर धवनचे संघात पुनरागमन होणार आहे. कर्णधार रोहित शर्माबरोबर तो सलामीवर येईल. विराट आज दुखापतीमुळे सामन्यास मुकल्यास तिसर्या स्थानावर श्रेयस अय्यरला संधी मिळण्याची शक्यता आहे. तर सूर्यकुमार यादव आणि ऋषभ पंत हे अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर फलंदाजीला येवू शकतात. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून संघात समावेश असेल.
टीम इंडिया जर आपली फलंदाजी मजबूत करण्याचा विचार केला तर शार्दुल ठाकुरला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. तर गोलंदाजीवर भर देण्याचा विचार झाला तर प्रसिद्ध कृष्णाला संधी मिळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचे संघातील स्थान पक्के आहे. तर फिरकीपटू म्हणून युजवेंद्र चहल या समावेश होईल, असे मानले जात आहे.
हेही वाचा :