![अजिंक्य रहाणे म्हणाला, फलंदाजीसाठी इंग्लंडमधील परिस्थिती आव्हानात्मक](http://media.assettype.com/pudhari%2Fimport%2Fwp-content%2Fuploads%2F2021%2F08%2Fajinkya-rahane-cheteshwar-pujara.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीआधी पत्रकार परिषदेला सामोरा गेला. त्यावेळी त्याने चेतेश्वर पुजाराचा फलंदाजीचा क्रमांक बदलण्याच्या शक्यता खोडून काढल्या.
तो म्हणाला, 'पुजारा हा आमचा तीन नंबरचा फलंदाज आहे. कसोटीत कोण सलामीला येणार हे अजून आम्ही ठरवलेलं नाही. पण, आमच्यासाठी पुजारा हा तिसऱ्या क्रमांकाचा चांगला फलंदाज आहे. सलामी जोडीचा निर्णय हा कर्णधार, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापन घेणार आहे.'
अजिंक्य रहाणेने व्यवस्थापन शार्दुल ठाकूरकडे एक चांगला ऑलराऊंडर म्हणून पाहत असल्याचे संकेत दिले. त्याला गोलंदाजी विभागात हार्दिक पांड्याची कमतरता कोण भरुन काढू शकतो, असे विचारले असता त्याने शार्दुल ठाकूरचे नाव घेतले. शार्दुल ठाकूरने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ७ बळी घेत एक अर्धशतकही ठोकले होते.
अजिंक्य रहाणे म्हणाला, 'प्रत्येक जण वेगळा असतो. हार्दिकने २०१८ मध्ये जी कामगिरी केली ती वेगळीच होती. शार्दुल देखील आमच्यासाठी चांगली फलंदाजी करु शकतो. तुम्ही शार्दुलला ऑस्ट्रेलियात फलंदाजी करताना पाहिले असेल. त्याने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्येही चांगली कामगिरी केली आहे.' शार्दुलने प्रथम श्रेणीत सात अर्धशतके ठोकली आहेत.
रहाणे पुढे म्हणाला की, 'बुमराह, शामी, सिराज, उमेश यादव आणि इशांत शर्मा हे नेटमध्ये चांगला घाम गाळत आहेत. ते फलंदाजीचाही सराव करत आहेत. त्यांनी शेवटी केलेल्या २०- ३० धावाही फार महत्त्वाच्या आहेत. ते नेटमध्ये १० ते १५ मिनिटे फलंदाजी करण्यासाठी उत्सुक असतात ही चांगली बाब आहे. याचा परिणाम नंतर दिसणार आहे. पण, प्रक्रिया, कष्ट आणि संघातील प्रत्येक खेळाडूचे योगदान महत्वाचे असते. आम्ही आमच्या तळातील फलंदाजांकडून काही योगदानाची अपेक्षा करत आहोत.'
पुजाराच्या फलंदाजीबाबत पुन्हा प्रश्न विचाल्यानंतर अजिंक्य रहाणे म्हणाला, 'नक्कीच आम्ही आमच्या फलंदाजीच्या प्लॅनबाबत एकत्र बसून एकमेकांशी चर्चा करत असतो. पण, इंग्लंडमधील वातावरण फलंदाजासाठी आव्हानात्मक असते. प्रत्येक फलंदाजाचे वेगवेगळे प्लॅन असतात आणि प्रत्येक जण आपल्या शैलीनुसारच खेळ करत असतो.'
'संवाद हा फलंदाजीसाठी महत्वाचा असतो. पण, मला वैयक्तिकरित्या प्रत्येकाने आपली पद्धत जपली पाहिजे. कारण, १५ ते २० मिनिटात इथे परिस्थिती बदलते. हे सर्व परिस्थितीशी लवकरात लवकर जुळवून घेण्यावर अवलंबून आहे. फलंदाजीसाठी आम्ही तयार आहोत.', असेही ताे म्हणाला.
अजिंक्य रहाणे बेन स्टोक्स बाबतही बोलला. तो म्हणाला की 'बायो बबल'चा (कोरोना प्रतिबंधासाठी सुरक्षित वातावरणात राहणे ) कंटाळा येणे हे वास्तव आहे. भारतीय संघ बेन स्टोक्सच्या खेळाडून ब्रेक घेऊन मानसिक स्वस्थ्यावर काम करण्याच्या निर्णयाचा पूर्णपणे आदर करतो.
अजिंक्य म्हणाला की, 'बायो बबलमधील आयुष्य खरोखरच आव्हानात्मक असते. तुम्हाला खेळाडूच्या मानसिकतेचाही विचार करावा लागले. ज्यावेळी तुम्ही सर्वोच्च स्तरावर खेळत असता, त्यावेळी तुम्हाला तुमचे शंभर टक्के योगदान द्यावे लागत असेत. त्यावेळी तुमचे मानसिक स्वास्थ अत्यंत महत्वाचे असते. '
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : महाराष्ट्रातील सर्वात मोठे ऑनलाईन शिक्षण प्रदर्शन आणि वेबिनार मालिका
https://youtu.be/86gQicR7sfM