‘मन झालं बाजिंद’ : राया- कृष्णावर होणार जीवघेणा हल्ला? | पुढारी

'मन झालं बाजिंद' : राया- कृष्णावर होणार जीवघेणा हल्ला?

पुढारी ऑनलाईन : आजवरच्या मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला असेल. परंतु, पहिल्यांदाच ‘मन झालं बाजिंद’ या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पाहायला मिळाली. ‘मन झालं बाजिंद’ या मालिका एका वेगळ्या वळणावर येवून ठेपली असून घुली मावशी राया आणि कृष्णावर जीवघेणा हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं- तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा बाजिंदा राया आणि मामा-मामीच्या घरी फुलासारखी वाढलेली, सी.ए. होण्याचं स्वप्नं पाहणारी, हुशार, सावरून घेणारी, मांडणी करणारी, संयमी, विचार करून कृती करणारी कृष्णा यांच्या बाजिंद्या प्रेमाची ही गोष्ट या मालिकेत आहे. या मालिकेने आणि त्यातील व्यक्तिरेखांनी अल्पावधीतच चाहत्यांची मने जिंकली आहेत.

अनेक अडचणींवर मात करून, प्रेमाची सत्वपरीक्षा दिल्यावर राया आणि कृष्णा एकत्र आले आहेत, पण त्यांच्या सुखात मिठाचा खडा टाकण्यासाठी घुली मावशी नेहमी सज्ज असते. सध्या राया घरापासून दूर हळदीच्या शेतात राहायला गेला आहे. राया घरात राहणार नाही म्हणून कृष्णा देखील आपल्या पतीची साथ देण्यासाठी त्याच्यासोबत हळदीच्या शेतात राहायला जाते. दोघांच्याही मनात एकमेकांसाठी अफाट प्रेम असल्यामुळे ते हळदीच्या शेतातील छोट्या घरात देखील आनंदाने राहतात.

भाऊसाहेबांना मात्र, रायाचं असं घरापासून दूर शेतात राहण्याचा निर्णय पटलेला नाही आणि याच संधीचा फायदा घुली मावशी घेणार आहे. कृष्णाचा काटा काढण्यासाठी घुली मावशीने असंख्य प्रयत्न केले. पण, राया कृष्णासोबत असल्यामुळे ते नेहमी असफल ठरले. पण आता घुली मावशी राया आणि कृष्णा घरापासून लांब असल्यामुळे या दोघांवर जीवघेणा हल्ला करणार आहे.

यामुळे या हल्ल्यातून राया आणि कृष्णा सुखरूप वाचतील का? राया आणि कृष्णाचं प्रेम या अडचणीवर देखील मात करेल का? हे पाहण्याची चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button