मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी का संपवत आहेत जीवनयात्रा? | पुढारी

मनोरंजन क्षेत्रातील सेलिब्रेटी का संपवत आहेत जीवनयात्रा?

पुढारी ऑनलाईन : प्रसिद्‍ध टीव्‍ही अभिनेत्री वैशाली ठक्‍कर ( Vaishali Takkar ) हिने इंदौर येथे गळफास घेऊन जीवन संपवलं. तिच्या या टोकाच्या निर्णयाने संपूर्ण मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. वैशाली मागील एक वर्षापासून इंदौर येथील आपल्‍या घरीच होती. घटनास्थळी पोलिसांनी तिने लिहलेली एक चिठ्‍ठी सापडली आहे. या घटनेने (जीवनयात्रा) मनोरंजन क्षेत्र पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

प्रसिद्ध अभिनेता किंवा अभिनेत्रींनी आपली जीवनयात्रा संपवणे हे काही मनोरंजन क्षेत्राला नवीन नाही. २०२० मध्ये अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूने या क्षेत्राला मोठा धक्का  बसला हाेता. गेल्या काही वर्षांत भारतातील मनोरंजन क्षेत्रातील कहानी घर घर की फेम समीर शर्मा, कॉमिक ते खलनायकापर्यंत पोहचलेला आसिफ बसरा, बालिका वधू या आयकॉनिक शोमील आनंदी म्हणजेच अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी, अनेक हिट चित्रपटांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून दिसलेला कुशल पंजाबी, बॉलिवूड अभिनेत्री जिया खान, ‘दिल तो हैप्पी है’ या टीव्ही शोमधील सेजल शर्मा यांनी देखील जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. परवीन बाबी, जिया खान, सिल्क स्मिता यांसारख्या अनेक जुन्या सेलिब्रेटींनी देखील काही कारणांनी आपली जीवनयात्रा संपवली होती.

मानसशास्‍त्र अभ्‍यासकांच्‍या मतानुसार, सेलिब्रेटींना वैयक्तिक जीवनातून सामाजिक जीवनात प्रवेश करताना परिस्थितीशी जुळवून घेता न येणे,  यश-अपयशाचा समतोल साधता न आल्याने आपल्या जीवनाचा शेवट करतात.  काहीवेळा मानसिक स्थिती, आयुष्यातील ताणतणाव, अपयश आणि एकाकीपणा या कारणाने देखील मनोरंजन क्षेत्रातील काहींनी आपल्या जीवनाचा त्याग केल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे.

‘नॅशनल क्राईम रेकॉर्ड’नुसार , वेगवेगळ्या स्तरातील लोकांची जीवन संपवण्याची कारणे ही वेगवेगळी असतात. यामध्ये सामान्यत: व्यावसायिक किंवा करिअरमधील समस्या, एकटेपणाची भावना, गैरवर्तन, हिंसा, कौटुंबिक समस्या, मानसिक विकार, व्यसन, दारू, आर्थिक नुकसान, तीव्र वेदना यांसारख्या कारणाने व्यक्ती आपली जीवनयात्रा संपवू शकते, असे यामध्‍ये म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button