अन् शम्मी कपूर यांनी भांगात भरली लिपस्टिक!
नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन
हिंदी सिनेमाला एक नवी परिभाषा देणारे अभिनेते शम्मी कपूर यांचा २१ ऑक्टोबरला वाढदिवस. त्यांचा जन्म १९३१ मध्ये मुंबईतील अजिंक्य रुग्णालयात झाला होता. त्यांचे खरे नाव होते-शमशेर राज कपूर. असं म्हटलं जातं की, शम्मी हे कपूर फॅमिलीतील पहिला मुलगा होता, ज्याचा जन्म रुग्णालयात झाला होता. त्यांच्या जन्माआधी त्यांच्या दोन भावांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे कुटुंबातून त्यांना खूप प्रेम मिळाले. वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी जाणून घेऊया.
राज कपूर यांच्यामुळे सोडली शाळा
शम्मी यांच्या जन्मानंतर पृथ्वीराज कपूर आपल्या कुटुंबाला घेऊन कोलकाता गेले होते. तेथे ७-८ वर्षे राहिले. १९३९ मध्ये शम्मीचे वडील न्यू थिएटर्स सोडून मुंबई परत आले आणि रणजित स्टुडिओ जॉईन केलं. त्यांनी १९३९ मध्ये पृथ्वी थिएटर्सची सुरुवात करत पहिले नाटक ‘शकुंतला’ केलं. या नाटकात आपला अभिनय दाखवण्यासाठी पहिल्यांदाच शम्मी यांना संधा मिळाली होती. त्यामुळे शंकुतला नाटकासाठी शम्मी यांना शाळेतून सुट्टी घ्यावी, असे राज कपूर यांना वाटले. परंतु, शाळेने सुट्टी देण्यास नकार दिला. हे ऐकून राज कपूर शम्मीच्या स्कूल प्रिन्सिपलवर भडकले आणि त्यांनी शम्मी यांची शाळाच बंद केली.
वडिलांनी कधीच केलं नाही लॉन्च
इंडस्ट्रीत सुरूवातीला असे मानले जायचे की, स्टार किड्सना चित्रपटात काम करण्यासाठी अधिक स्ट्रगल करावं लागत नाही. परंतु, शम्मी कपूर यांच्यासोबत असं काही घडलं नाही. त्यांचे वडील पृथ्वीराज कपूर यांनी त्यांना कधीच चित्रपटात काम दिलं नाही आणि लॉन्चही केलं नाही. शम्मी यांनी आपल्या चित्रपट करिअरची सुरूवात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून केली हती. यासाठी त्यांना १५० रुपये मिळायचे.
पहिला चित्रपट
शम्मी कपूर यांनी ‘जीवन ज्योति’ चित्रपटातून इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. सुरुवातीला शम्मी यांचे चित्रपट लोकांना आवडले नाहीत. पुढे त्यांनी ‘तुमसा नहीं देखा’, ‘दिल देके देखो’, ‘जंगली’, ‘कश्मीर की कली’, ‘तिसरी मंजिल’, ‘एन इवनिंग इन पैरिस’, ‘ब्रह्मचारी’, ‘प्रिंस’ और ‘अंदाज’, ‘कॉलेज गर्ल,’ ‘चायना टाऊन,’ ‘प्यार किया तो डरना क्या’ यांसारखे उत्तम चित्रपट केले. शम्मीच्या वेगळ्या अंदाजामुळे आणि मानतोड डान्समुळे ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. इतकेच नाही तर १९६८ मध्ये रिलीज झालेला चित्रपट ‘ब्रह्मचारी’साठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कारदेखील मिळाला होता.
अभिनेता शम्मी यांना अभिनेत्री गीता बाली यांच्याशी लग्न करायचं होतं. दोघांची भेट ‘कॉफी हाऊस’मध्ये झाली होती. दोघांनी रंगीन रातें (१९५५) मध्ये एकत्र काम केलं होतं. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी शम्मी आणि गीता रानीखेत गेले होते. तेथे त्यांची लव्ह स्टोरी सुरू झाली.
आजच्या आज लग्न करायचं…
एकदा अचानक गीता यांनी शम्मी यांना सांगितलं की, त्यांना शम्मीशी लग्न करायचं आहे. विशेष म्हणजे आजच्या आज लग्न करायचं, अशी अट गीता यांनी शम्मी यांच्या पुढे ठेवली. गीता आणि शम्मी जॉनी वॉकर यांच्याकडे गेले. त्यांनी मंदिरात जाऊन लग्न करण्याचा सल्ला दिला. दोघेही मंदिरात गेले आणि त्यांनी एकमेकांना वरमाला घातली. केसाच्या भांगात सिंदूर भरण्याऐवजी गीता यांनी आपल्या पर्समधून काढून दिलेल्या लिपस्टिकने शम्मी यांनी गीता यांची भांग भरली. हे त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असल्याचे शम्मी यांनी म्हटले होते.
१९६५ मध्ये गीता बाली यांचा मृत्यू झाला. त्यानंतर शम्मी डिप्रेशनमध्ये गेले. ४ वर्षांनी शम्मी यांनी नीला देवी यांच्याशी दुसरा विवाह केला होता. नीला कधीही आई होणार नाही आणि गीता बालीच्या मुलांना आपल्या मुलांसारखं सांभाळेल, अशी अट शम्मी यांनी नीला यांच्यासमोर ठेवली.
वाचा – चहलचा रोमँटिक अंदाज; म्हणतो ‘ही’ माझी Perfect Evening!