

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा: : कोरोना महारोगराईमुळे जीडीपी वाढीचा दर वेग मंदावला होता.पंरतु, सर्वच क्षेत्रात सरकारच्या आश्वासक धोरणांमुळे, सर्व भागधारकांच्या वचनबद्धतेमुळे २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन ( जीडीपी ) वाढीचा दर २०.१ टक्क्यांच्या विक्रमी उच्चांकावर पोहचला आहे, अशी माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
२०२५ पर्यंत पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने सरकारने १.४ ट्रिलियन डॉलर्स निधीची तरतूद करीत अर्थव्यवस्थेला मोठी चालना दिली असल्याचेही ते म्हणाले.नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या "रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात गुंतवणूकीसाठी व्यवसाय सुलभता" या विषयावरील वेबिनारला संबोधित करताना ते बोलत होते.
महारोगराईमुळे लोकांचे आरोग्य, राष्ट्राची अर्थव्यवस्था या दोन्ही बाबतीत आपण अतिशय आव्हानात्मक काळातून जात आहोत.
अशात उद्योगस्नेही,त्रास मुक्त असे पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने धोरणांची पुनर्रचना करून उद्योगांना पाठबळ देण्यात सरकार आघाडीवर असल्याचे गडकरी म्हणाले.
चांगल्या प्रकारे विकसित केलेल्या पायाभूत सुविधांचे अनेक फायदे आहेत. हे फायदे प्रथम, आर्थिक व्यवहारांचा स्तर वाढवतात, शासनाचा महसूली पाया सुधारतात आणि शेवटी, उत्पादक क्षेत्रांवर केंद्रित खर्च सुनिश्चित करतात असे गडकरींनी यावेळी स्पष्ट केले.
देशातील सर्वांगीण आणि एकात्मिक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी.'गतीशक्ती' योजनेचा राष्ट्रीय बृहत आराखडा १०० लाख
कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
गतीशक्ती योजनेचा बृहत आराखडा राष्ट्रीय पायाभूत सुविधा पाइपलाइन कार्यक्रमाची रूपरेषा प्रदान करेल आणि रसद खर्च कमी करून पुरवठा साखळी सुधारत भारतीय उत्पादनांना अधिक स्पर्धात्मक बनवण्याचा उद्देश आहे.
भारतातील महामार्ग क्षेत्र कामगिरीत आणि नवोन्मेषात आघाडीवर आहे आणि सरकारने खाजगी विकासकांच्या स्वारस्याचे नूतनीकरण करून देशातील रस्ते बांधणीला गती देण्यासाठी अनेक प्रकल्प यशस्वीपणे आणले आहेत, असे गडकरी यावेळी म्हणाले.
हेही वाचलं का ?