

Humayun Kabir Net Worth
कोलकाता : पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे बाबरी मशिदीच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचा पायाभरणी कार्यक्रमानंतर आमदार हुमायून कबीर चर्चेत आले आहेत. शनिवारी (दि.६ डिसेंबर) त्यांनी बाबरी मशिदी प्रतिकृती असणार्या मशीदीच्या पायाभरणी कार्यक्रम आयोजित केला होता. यापूर्वीच तृणमूल काँग्रेसने त्यांना पक्षातून निलंबित केले. जाणून घेऊया थेट मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धमकी देणारे कबीर यांच्या संपत्ती आणि पुढील राजकीय वाटचालीविषयी....
हुमायून कबीर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात काँग्रेस पक्षातून केली. पंचायत निवडणुका त्यांनी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर लढवल्या. एकेकाळी पश्चिम बंगालमधील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे निकटवर्ती अशी त्यांची ओळख होती. २०११ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकलीही. काँग्रेस पक्षातून तृणमूल काँग्रेसमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना मंत्री बनवण्यात आले; परंतु रेजिनानगर विधानसभा पोटनिवडणुकीत ते पराभूत झाले आणि मंत्रीपदही गमवावे लागले.
हुमायून कबीर यांनी २०१५ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ममता बॅनर्जी आपल्या भाच्याला राजकारणात प्रस्थापित करत असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावेळी शिस्तभंगाची कारवाई करत पक्षाने त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. यानंतर ते काही काळासाठी समाजवादी पार्टीत होते. २०१६ च्या विधानसभा निवडणूक त्यांनी अपक्ष म्हणून लढली. मात्र या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर पराभवानंतर ते काँग्रेसमध्ये सामील झाले; परंतु त्यानंतर लवकरच २०१८ मध्ये भाजपमध्ये सामील झाले. २०२० मध्ये ते तृणमूल काँग्रेसमध्ये परतले.
हुमायून कबीर हे मागील दोन दशकांहून अधिक काळ राजकारणात आहेत.MyNeta वेबसाइटनुसार, कबीर यांनी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्याकडे एकूण मालमत्ता सुमारे ३.०७ कोटी रुपये आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्तेचा समावेश आहे. कबीर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या जंगम मालमत्तेचे एकूण मूल्य सुमारे ९७ लाख इतके आहे. यामध्ये बँक खात्यांमधील शिल्लक, रोख रक्कम, विमा योजना आणि कुटुंबाच्या नावावर नोंदवलेली अनेक वाहने समाविष्ट आहेत. त्यांच्याकडे मोठी आणि महागडी वाहने आहेत. यामध्ये आलिशान गाड्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. व्यावसायिक कामांसाठी वापरले जाणारे उपकरणेही त्यांच्या चल संपत्तीचा भाग आहेत. स्थावर मालमत्तेमध्ये मुर्शिदाबाद आणि कोलकाता येथे अनेक जमिनी आणि निवासी मालमत्ता आहेत. त्याचे एकूण मूल्य सुमारे १.९७ कोटी रुपये इतके आहे. मुर्शिदाबादमध्ये त्यांच्या नावावर अनेक शेतजमिनीची नोंद आहे. याव्यतिरिक्त, कोलकातामधील न्यू टाऊन आणि कॉलिन स्ट्रीट परिसरात त्यांचे फ्लॅट आहेत. बरहामपूर येथील त्यांचे घर देखील आहे प्रतिज्ञापत्रामध्ये त्यांच्या पत्नीच्या मालमत्तेचा तपशीलही दिला आहे. त्यांच्याकडे सुमारे ४५० ग्रॅम सोन्याचे दागिने, बँक जमा रक्कम आणि पतीसोबतच्या संयुक्त मालमत्तेतील हिस्सा यांचा समावेश आहे. एकूणच कबीर यांच्या नावार अधिकृत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.
आमदार हुमायून कबीर यांनी शनिवारी बाबरी मशिदीच्या धर्तीवर उभारण्यात येणाऱ्या मशिदीचे भूमिपूजन केले. याच्या दुसऱ्या दिवशी एका वृत्तवाहिनीशी बोलताना कबीर यांनी २२ डिसेंबर रोजी आपला स्वतःचा पक्ष स्थापन करण्याची आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्या 'एमआयएम' (AIMIM) सोबत युती करण्याचा प्रयत्न करण्याची घोषणा केली. पुढील वर्षी होणाऱ्या बंगाल निवडणुकीत विधानसभेच्या २९४ पैकी १३५ जागांवर उमेदवार उभे करण्याचा त्यांनी निर्धार केला आहे. यामुळे आपण राज्याच्या राजकारणात 'गेम-चेंजर' ठरू, असा दावा त्यांनी केला आहे.
मागील एक महिन्यापासून कबीर हे पश्चिम बंगालमधील नवीन धर्मनिरपेक्ष आघाडीबाबत विधाने करत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) सोबत चर्चा सुरू असल्याचा दावाही करत आहेत. मुर्शिदाबाद, मालदा, नादिया आणि २४ परगणा जिल्ह्यांचे हेलिकॉप्टर दौरे देखील जाहीर केले आहेत.
"मी एक नवीन पक्ष स्थापन करेन जो मुस्लिमांसाठी काम करेल. मी १३५ जागांवर उमेदवार उभे करेन. मी बंगाल निवडणुकीत गेम-चेंजर बनेन. मी एमआयएमच्या संपर्कात आहे. त्यांच्यासोबत निवडणूक लढवणार आहे. ओवैसींशी माझी चर्चा झाली आहे," असा दावाही त्यांनी केला आहे. दरम्यान, याबाबत ओवैसी यांनी याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आता तृणमूल काँग्रेसमधून निलंबित झाल्यानंतर कबीर यांनी थेट पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना आवाहन दिले आहे. "मी भाजपला बंगालमध्ये सत्तेत येऊ देणार नाही. तसेच, तृणमूल आपले पुढील सरकार स्थापन करू शकणार नाही. आता असलेल्या मुख्यमंत्र्यांना माजी मुख्यमंत्री व्हावे लागेल. २०२६ मध्ये मुख्यमंत्री आता मुख्यमंत्री राहणार नाहीत. त्या शपथ घेणार नाहीत आणि त्यांना माजी मुख्यमंत्री म्हटले जाईल. भारतातील अनेक उद्योग मला मदत करणार आहेत. भारतातील मुस्लिमांकडे मोठा निधी आहे; ते बाबरी मशीद बांधण्यास मदत करणार आहेत," असा दावाही कबीर करत आहेत.