Gujarat High Court संतापले; तुम्ही कोण सांगणार मांसाहार करायचा नाही… | पुढारी

Gujarat High Court संतापले; तुम्ही कोण सांगणार मांसाहार करायचा नाही...

अहमदाबाद, पुढारी ऑनलाईन:  Gujarat High Court :  गुजरातमध्ये मांसाहार विकणाऱ्या विक्रेत्यांच्या गाड्या कुठल्या आदेशाने हटविल्या? माणसामाणसांत भेदभाव करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? असा सवाल करत गुजरात हायकोर्टाने अहमदाबाद नगरपालिकेला चांगलेच फटकारले आहे. नगरपालिका आयुक्तांना मधुमेह आहे म्हणून लोकांना उसाचा रस पिऊ नका म्हणून सांगणार का? ते जर सांगणार नसाल तर हा सल्ला का देता असा सवालही केला.

अहमदाबाद येथील रस्त्यांवर मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्याविरुद्ध कारवाई केल्यानंतर आता हे प्रकरण हायकोर्टात गेले आहे. आम्ही काय खायचे आणि काय नाही, हे तुम्ही का ठरवता? असा सवालही अहमदाबाद नगरपालिकेला विचारला.

२५ फेरीवाल्यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली असून त्यावर सुनावणी झाली. अहमदाबाद महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका स्थानिक नगरसेवकाच्या तक्रारीनंतर मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करत गाड्या जप्त केल्या होत्या. त्यावरून गुजरात हायकोर्टने फटकारत लवकरात लवकर याचिकाकर्त्यांना त्यांचे सामान परत देण्याचे निर्देश दिले.

सुनावणीवेळी न्यायमूर्ती वीरेन वैष्णव यांनी सरकारी वकिलांना म्हणाले, ‘नगरपालिकेला कुठल्या गोष्टीवर आक्षेप आहे, त्यांना नेमका कशाचा त्रास होतोय? तुम्हाला मांसाहार आवडत नाही, हे तुमचे व्यक्तिगत मत झाले. मी बाहेर काय खायचे आणि काय नाही, हे तुम्ही कसे काय ठरवू शकता? नगरपालिका आयुक्तांना तातडीने बोलावून घ्या आणि त्यांचा विचारा की ते नेमके काय करणार आहेत. उद्या ते म्हणतील मला मधुमेह आहे, तुम्ही उसाचा रस पिवू नका, कॉपी पिवू नका, आरोग्यसाठी चांगले नसते. ही तुमची मनमानी आहे का?’

Gujarat High Court मध्ये मांसाहार प्रकरणी याचिका

याचिकाकर्त्यांनी गुजरात हायकोर्टात त्यांच्या गाड्या जप्त केल्याप्रकरणी याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या याचिकेत म्हटले होते, कुठल्याही सूचनेशिवाय, आदेशाशिवाय आमचे गाडे जप्त करण्यात आले. तसेच बडोदा, सूरत, भावनगर, जूनागढ़ आणि अहमदाबाद येथेही कारवाया सुरू आहेत. मागच्या महिन्यात राजकोटच्या महापौरांनी वादग्रस्त विधान केले होते. ‘मांसाहारी पदार्थ विकणारे धार्मिक भावना दुखावण्याचे काम करत आहेत.’

वकील म्हणाले, काहीतरी गैरसमज झालाय

अहमदाबाद नगरपालिकेचे वकील सत्यम छाया म्हणाले, या केसमध्ये काहीतरी गैरसमज झाला आहे. त्यामुळे याचिका दाखल केली आहे. सगळ्याच मांसाहारी विक्रेत्यांचे गाडे हटविण्याची मोहीम हाती घेतलेली नाही. या विक्रेत्यांनी रस्त्याकडेला अतिक्रमण केले होते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता.

तुमची हिंमत कशी झाली…

नगरपालिकेच्या वकिलाला फटकारत न्यायमूर्ती वैष्णव यांनी खडे बोल सुनावले. ते म्हणाले, जर वस्त्रपूर तलावाजवळ विक्रेते अंडी विकत असतील आणि सत्तेत आलेली पार्टी रातोरात सांगत असेल की आम्हाला अंडी खायची नाहीत, त्याला आपण रोखले पाहिजे. मग तुम्ही त्यांना हटवणार? तुम्ही असे का करता आहात? तुम्ही तुमच्या आयुक्तांना हजर रहायला सांगात. लोकांमध्ये भेदभाव करण्याची हिंमत कशी झाली?

हेही वाचा : 

Back to top button