पीएम नरेंद्र मोदींना अमरिंदर सिंग म्हणाले, कृषी कायदे रद्द करा अन्यथा लोक… | पुढारी

पीएम नरेंद्र मोदींना अमरिंदर सिंग म्हणाले, कृषी कायदे रद्द करा अन्यथा लोक...

नवी दिल्ली, पुढारी ऑनलाईन

amarinder singh पंजाबमध्ये तुम्हाला प्रचाराला यायचे असेल तर कृषी कायदे रद्द करा, असा सल्ला पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला आहे. अमरिंदर सिंग यांनी नवीन पक्ष स्थापन केला असून पंजाब निवडणुकीत हा पक्ष भाजपशी युती करेल असे सांगण्यात आले होते. मात्र, अमरिंदर सिंग यांनी केलेल्या नव्या मागणीने युतीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

केंद्र सरकारच्या तीन नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून शेतकरी संघटनां दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसले आहेत. कायदे रद्द करण्याव्यतिरिक्त अन्य कुठल्याही मागणीवर शेतकरी चर्चा करण्यास तयार नाहीत. तसेच सरकारकडूनही कुठलाच संवाद सुरू नाही. त्यामुळे दिल्लीची कोंडी झाली आहे.

या पार्श्वभूमीवर अमरिंदर सिंग amarinder singh म्हणाले, ‘पंजाबमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी कृषी कायदे रद्द करणे आवश्यक आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी लोक राजकीय पक्षांना प्रचार करू देणार नाहीत. पंजाबमध्ये ही शस्त्रे का येत आहेत? असेही ते म्हणाले.

एका इंग्रजी दैनिकाच्या कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले, ‘जर तुम्हाला शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कृषी कायद्यांसंदर्भात तोडगा काढता येणार नसेल, तर आपल्यापैकी कुणीही कोणत्याच गावात जाऊन निवडणूक प्रचार करू शकणार नाही. कारण शेतकरी तुम्हाला गावात शिरूच देणार नाहीत. भारत सरकारने शेतकऱ्यांशी संवाद साधून कृषी कायद्यांवर तोडगा काढायला हवा.

पंजाबमध्ये शस्त्रे का येतात?

पंजाबमध्ये ही शस्त्रे का येत आहेत? असा सवालही त्यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले,‘पंजाब शांतताप्रिय आहे आणि इथे दहशतवादी भरती होत नाहीत. या चळवळीतून वेगळे काही निष्पन्न होण्यापूर्वी हे सर्व थांबले पाहिजे. पाकिस्तानमधून येणारे ड्रोन थांबवण्यासाठी शेतकरी आंदोलन संपलेच पहिजे.’

शेतकऱ्यांसाठी महापंचायत

लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचारात जखमी शेतकऱ्यांना १० लाख रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र, ती मदत दिलेली नाही. कृषी कायद्यांचा निषेध करण्यासाठी काढलेल्या या रॅलीला चिरडून टाकले होते.त्याचा देशभर निषेध केला. लखीमपूर खिरी घटनेमध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर अनेक जण जखमी झाले होते. मात्र जखमींना अद्यापही मदत मिळाली नसल्याने संघटनांमध्ये संताप आहे. २६ नोव्हेंबर पर्यंत जर मदत मिळाली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच महापंचायत बोलविण्यात येणार आहे.

अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींना मारहाण

उत्तरप्रदेश, हरियाणा आणि पंजाब या तीन राज्यांमध्ये शेतकरी आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत. या ठिकाणी लोकप्रतिनिधींना कार्यक्रम घेणे मुश्किल बनले आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनाही अनेक कार्यक्रमात रोखले आहे. पंजाबमध्ये भाजपच्या अनेक लोकप्रतिनिधींना कपडे फाटेपर्यंत मारहाण झाली आहे. उत्तरप्रदेशात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भाजपला मोठा फटका बसला आहे.

हेही वाचा : 

Back to top button