Mahant Narendra Giri death case : हरिव्‍दारमध्‍ये दाेन दशकात काही साधूंच्‍या हत्‍या, २४ हून अधिक साधू बेपत्ता | पुढारी

Mahant Narendra Giri death case : हरिव्‍दारमध्‍ये दाेन दशकात काही साधूंच्‍या हत्‍या, २४ हून अधिक साधू बेपत्ता

हरिव्‍दार; पुढारी ऑनलाईन : भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज मूत्‍यू प्रकरण ( Mahant Narendra Giri death case ) सध्‍या चर्चेत आहे. मात्र हरिव्‍दारमध्‍ये यापूर्वीही आखाड्याचे साधू बेपत्ता होणे व त्‍यांची हत्‍या होणे या घटना वारंवार घडल्‍या आहेत.हरिव्‍दारमध्‍ये मागील दोन दशकांमध्‍ये तब्‍बल २४ हून अधिक साधू बेपत्ता झाले आहेत, तर काहींचा हत्‍या झाल्‍या आहेत, असे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे.

महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा संशयास्पद मृत्यू ( Mahant Narendra Giri death case ) झाल्याचे २० सप्‍टेंबर रोजी उघडकीस आले. अल्लापूर येथील वाघंबरी मठाच्या खोलीत त्यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्‍यांनी लिहिलेली एक चिठ्ठीही पोलिसांनी ताब्यात घेतली.

महंत नरेंद्र गिरी यांना ब्लॅकमेल करण्यात येत होते. त्यांच्या एक व्हिडीओची सीडी तयार करण्यात आली होती. पोलिसांनी ही सीडीही जप्‍त केली आहे. याप्रकरणी विविध राजकीय पक्षांशी संबंधित सहाजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, महंतांचा चेला आनंद गिरी याच्याविरुद्ध महंतांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिव्‍दार पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे.

वीस वर्षांमध्‍ये २४ हून अधिक साधू बेपत्ता

एका इंग्रजी दैनिकाने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटले आहे की, हरिव्‍दार येथून एखादा साधू बेपत्ता होणे किंवा त्‍याचा हत्‍या होणे ही घटना नवीन नाही. हरिव्‍दार येथून मागील वीस वर्षांमध्‍ये २४ हून अधिक साधू बेपत्ता झाले आहेत. यातील काहींच्‍या हत्‍या झाल्‍याचेही उघड झाले आहे.

बोगस साधकांची यादी उजेडात आल्‍यानंतर १६ सप्‍टेंबर २०१७ रोजी श्री पंचायती बडा उदासीन आखाड्याचे महंत मोहन दास हे बेपत्ता झाले होते. ते रेल्‍वेने हरीव्‍दार ते मुंबई प्रवास करत असताना ही घटना घडली होती.

या प्रकरणाच्‍या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची (एसआयटी) नियुक्‍ती करण्‍यात आली होती. मात्र अद्‍याप पोलिसांना महंत मोहन दास यांचा शोध घेता आलेला नाही.

गेली पाच वर्ष झाले महंत मोहन दास हे बेपत्ताच आहेत. रेल्‍वे प्रवासातून एखादी व्‍यक्‍ती बेपत्ता कशी होईल, या प्रकरणी पोलिसांनी कोणतेही धागेदोरे मिळाले नाहीत.

बोगस साधकांची यादी उजेडात आणण्‍यात त्‍यांची मोठी कामगिरी होती. ही यादी उजेडात आल्‍यानंतरच मंहत मोहन दास बेपत्ता होणे हा फार मोठा कट आहे, याप्रकरणाची सखोल चौकशी करण्‍यात यावी, अशी मागणी निरांजनी आखाड्याने केली आहे.

मंहत मोहन दास यांच्‍या हत्‍येनंतर संशयाची सुई नरेंद्रगिरी यांच्‍यावर होती.

यासंदर्भात बुधवारी निरंजन आखाड्याने आपली भूमिका स्‍पष्‍ट केली आहे.

महंत मोहन दास यांचा मृत्‍यू झाला असावा, असे त्‍यांच्‍या आखाड्यातील साधू मानत आहेत.

काही जण बेपत्ता तर काहींच्‍या हत्‍या

महंत शंकर देव हे जुलै २००७ पासून बेपत्ता आहेत.

केंद्र सरकारने २०१३मध्‍ये या प्रकरणाच्‍या सीबीआय चौकशी करण्‍याचे आदेश दिले होते.

जून २००१ मध्‍ये स्‍वामी विष्‍णूगिरी आणि अन्‍य चार साधू यांची हरी की पूरीजवळ हत्‍या झाली होती.

ऑगस्‍ट २००२मध्‍ये साधू ब्रम्‍हानंद यांची तर १२ डिसेंबर २००० रोजी साध्‍वी प्रेमानंद यांची हत्‍या झाली होती.

अनेक प्रकरणांचा अद्‍याप तपास सुरुच

हरिव्‍दार जवळच्‍या बेलदा गावाजवळ १४ एप्रिल २०१२ रोजी महार्निवाण आखाड्याचे सुधीर गिरी यांची गोळ्या घालून हत्‍या करण्‍यात आली होती.

ही हत्‍या जमीन विक्रीला विरोध केल्‍याने झाली असल्‍याची चर्चा त्‍यावेळी होती.

काही साधूंच्‍या हत्‍याप्रकरणी संशयित आराेपींना अटकही झाली आहे.

मात्र बहुतांश प्रकरणातील सूत्रधारांपर्यंत पोलिसांना पाेहचता आलेले नाही.

तसेच एकाही प्रकरणातील आराेपींना कठोर शिक्षाही झालेली नाही, असे महार्निवाण आखाड्याने म्‍हटलं आहे.

आता नरेंद्र गिरी मूत्‍यू प्रकरणामुळे ( Mahant Narendra Giri death case ) महंत व साधूंची हत्‍या व बेपत्ता याची चर्चा पुन्‍हा जोरदार सुरु आहे.

हेही वाचलं का ? 

 

Back to top button