नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. ही भेट पंतप्रधान कार्यालयात तब्बल २० ते २५ मिनिटे झाल्याची चर्चा आहे. राज्यात सध्या ईडीचा डाव सुरु असल्याने त्या पार्श्वभूमीवर ही भेट होती की काल संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचा त्याला संदर्भ होता याबाबतच माहिती मिळालेली नाही.
दुसरीकडे राज्यातील राष्ट्रवादीचे दोन नेते जेलमध्ये आहेत. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ईडी कमालीची सक्रीय झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी नेत्यांमध्येच धास्ती पसरली आहे. भाजप नेत्यांकडून सातत्याने ईडीचा उल्लेख होत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी, तर आगामी काही दिवसांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ जेलमध्ये असतील असे थेट वक्तव्य केले आहे.
त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी पंतप्रधानांची भेट होत आहे का याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे या भेटीनंतर राज्यात राजकीय धुरळा उडाला आहे. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या भेटीवर भाष्य करताना राष्ट्रवादी आणि भाजपची एवढी कटूता नसल्याचे म्हटले आहे. राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरी यांनी भेटीवर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार यांचे मत वैयक्तिक असल्याचे सांगितले.