UP Election Result : उत्तर प्रदेशात मायवतींच्या बसपाचा प्रचार का थंड पडला ? | पुढारी

UP Election Result : उत्तर प्रदेशात मायवतींच्या बसपाचा प्रचार का थंड पडला ?

पुढारी ऑनलाईन डेस्क : यावेळी उत्तर प्रदेश निवडणुकीत (UP Election Result ) एक गोष्ट स्पष्टपणे दिसून आली. ती म्हणजे निवडणुकीच्या रणधुमाळीत सुरुवातीपासूनच ‘हत्ती’ गायब होता. भाजप असो, सपा असो, काँग्रेस किंवा आप आणि एमआयएम असो, ज्यांना उत्तर प्रदेशमध्ये सत्ता मिळवायची आहे त्या सर्वांनीच सर्वांनीच जीवाचे रान केले. यादरम्यान प्रियंका गांधी यांनी 209 तर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 203 रॅली काढल्या. इतर पक्षांनीही जोरदार प्रचार केला. पण, अनेक दशके राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या बसपचा ‘शो’ मात्र थंड होता . मायावतींच्याही पूर्वीसारख्या प्रचंड सभा झाल्या नाहीत. तसेच त्या ही फारशा सक्रिय दिसल्या नाहीत.

मायावतींना ( UP Election Result ) लोक प्रेमाने बहनजी म्हणतात. यापुर्वी त्यांच्या हत्तीने येथे अनेक पक्षांना पायदळी तुडवले आहे. मात्र या निवडणुकीत त्यांचा उशिरा एन्ट्री झाली. यंदाचा त्यांचा अत्यंत मवाळ आणि मृदू आवाजातला प्रचाराने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. शिवाय पक्षातही उच्चस्तरीय फेरबदलाच्या चर्चांना उधाण आले आहे.

यूपीची गादी  ( UP Election Result ) कोण घेणार हे चित्र 10 मार्चला स्पष्ट होणार आहे. मात्र, याआधी आलेल्या सर्व एक्झिट पोलमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करताना दिसत आहे. समाजवादी पक्ष त्यांचा दुसरा जवळचा प्रतिस्पर्धी आहे. बसपा मात्र दूर दूर पर्यंत कोठेच दिसत नाही अशी परिस्थिती आहे. एक्झिट पोलचे आकडे खरे ठरले तर मायावतींच्या कोअर व्होटबँकेला खीळ बसल्याचे स्पष्ट होते. प्रत्येक निवडणुकीत ज्याप्रकारे दुर्दैवाला सामोरे जावे लागत आहे, ते पाहता पक्षाला वेगळी रणनीती आखावी लागणार आहे.

उत्तर प्रदेशात दलितांची संख्या २१ टक्के आहे. बसपाने 2007 मध्ये बहुमताने आपले सरकार स्थापन केले. यादरम्यान त्याच्या सोशल इंजिनिअरिंगच्या फॉर्म्युल्याबद्दल बरीच चर्चा झाली. मात्र, त्यानंतर पक्षाची व्होट बँक झपाट्याने घसरली. अर्थात जाटव दलित पक्षाशी संबंधित राहिले. पण, जाटवेतर दलित मतांवर बसपची पकड सैल होत चालली आहे. मुस्लीम मतदारही त्यांच्यापासून दूर गेले आहेत.

उत्तर प्रदेश निवडणुकीदरम्यान ( UP Election Result ) मायावतींच्या संदर्भात आणखी एका गोष्टीची चर्चा झाली आहे. मायवतींचा काँग्रेस, सपा आणि इतर पक्षांबद्दलचा दृष्टिकोन होता तो भाजपबद्दल दिसला नाही. संपूर्ण निवडणुकीत त्यांनी भाजप आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर कधीही जोरदार टिका केली नाही.

निवडणुकीच्या काळातच गृहमंत्री अमित शहा यांनी मायावतींचे कौतुक केले, तेव्हा भाजप आणि बसपामध्ये अंतर्गत हातमिळवणी झाल्याची चर्चाही सुरू झाली. बसपा भाजपची ‘बी’ टीम म्हणून काम करत आहे. मायावतींचा प्रभाव संपलेला नाही, असे शहा म्हणाले होते. राज्यात आजही त्यांची मोठी ताकद आहे.

मायावतींचे वाढते वय हे देखील त्यांच्या सक्रिय नसण्याचे कारण असल्याचे अनेकांचे मत आहे. मायावती 66 वर्षांच्या आहेत. खरे तर सतीशचंद्र मिश्रा पक्ष चालवत आहेत. निवडणुकीच्या रणनीतीपासून पक्षाची दिशा ठरवण्यापर्यंतची संपूर्ण जबाबदारी सतीशचंद्र मिश्रांवर आहे. दरम्यान, त्यांनी भाऊ आनंद कुमार आणि पुतण्या आकाश आनंद यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. यावरून पक्ष सुप्रिमोला आता पक्षाचा भार वाटून घ्यायचा आहे, असे स्पष्ट होते.

अजून एक गोष्ट की काही लोक मायावतींच्या मवाळ वृत्तीला त्यांच्या भीतीशी जोडून पाहत आहेत. मायावती आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा खटला सुरू आहे. कदाचित ते दबाव देखील आहे.

Back to top button