अमरावती : चिखलदरा तालुक्यात मोठी घटना! ३४ विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा | पुढारी

अमरावती : चिखलदरा तालुक्यात मोठी घटना! ३४ विद्यार्थिंनींना अन्नातून विषबाधा

अमरावती; पुढारी वृत्तसेवा : चिखलदरा येथील वडगाव फत्तेपूर स्थित एकलव्य निवासी पब्लिक स्कुलमधील तब्बल ३४ विद्यार्थिंनींना नाश्त्यातून विषबाधा झाली. ही धक्कादायक घटना गुरुवार, २७ जुलै रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या विद्यार्थ्यांना उपचाराकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अनुसूचित जातीच्या मुलींना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्यात महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिकच्या नियंत्रणात असलेल्या इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळा चिखलदरा येथील वडगाव फत्तेपूर येथे स्थानांतरित झाली होती. चिखलदरा येथील एकलव्य रेसिडेन्शिअल स्कूल गेल्या काही वर्षापासून वडगाव फत्तेपूर येथे एका भाड्याच्या इमारतीत चालविल्या जात आहे. या शाळेत वर्ग सहा ते बारावीपर्यंतचे ३२० विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या विद्यार्थ्यांना भोजन कंत्राटदाराकडून नाश्ता व जेवण पुरविल्या जाते. गुरुवारी सकाळी विद्यार्थिनींनी पोह्यांचा नाश्ता व पाणी पिले. परंतू त्यानंतर त्यांच्या प्रकृती अचानक बिघडल्या. त्यामुळे त्यांना अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात तत्काळ दाखल करण्यात आले. यामध्ये समृद्धी कनाके (१२), अस्मिता प्यारेलाल दहीकर (१३), सईसा कुंभरे (१३), अश्विनी नामदेव नांदे (१३), प्राची एकनाथ वाळके (१२), काजल कासदेकर (१३) पल्लवी खंडेराव डाखोरे (१३), कीर्ती किसन मेटकर (१४), जोत्सना दत्ता अढाऊ (१७), प्रवीती वासुदेव नगड (१३), अनुश्री देवानंद मसराम (१२), वैष्णवी विश्वबरं बुचके (१३), अंजली विजय घोडे (१३), रिया ज्ञानेश्वर अंभोरे (१४), शिवानी दिलीप गाडेकर (१६), रिया दत्ता कुळमेथे (१५), आरती जयराम बेलसरे (१३), गौरी बब्बु उईके (१४), श्रुती विजय कनाके (१५), प्रतिशा शिवाजी धनवे (१३), शिवानी पासराम धांडे (१४), श्वेता गणेश ठाकरे (१२), प्रतीक्षा रमेश मडघणे (१४), श्वेता मंगेश ठाकरे (१२), पार्वती वासुदेव गठाण (१३), तनुजा मारोती चिरंबे (१४), श्रुती गोपाल लोखंडे (१५), कोमल श्रीराम ठाकरे (१३) यांचा समावेश आहे.
अचलपूर उपजिल्हा रुग्णालय अधिक्षक डॉ. सुरेंद्र ढोले यांच्या म्हणण्यानुसार या खाण्यातून विषबाधा झाल्याचे प्राथमिक लक्षणे दिसुन येत आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार जात आहे. ते धोक्याबाहेर असून २४ तासापर्यंत त्यांना देखरेखीत उपचार केल्या जाणार आहे. त्यामुळे या घटनेनंतर आरोग्य विभागही अलर्ट झाला आहे.
या घटनेची माहिती मिळताच अचलपूर उपविभागीय पोलिस अधिकारी अतुलकुमार नवघरे व अचलपूर तहसीलदार संजयकुमार गरकळ यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन रुग्णाच्या प्रकृतीचा आढावा घेतला. मिळालेल्या माहीतीनुसार मुख्याध्यापक हे दोन दिवसापासून रजेवर असून अतिरिक्त पदभार रविंद्र चौगुले यांच्याकडे होता. विद्यार्थ्यांना नाश्ता व भोजन पुरविण्याचा करार नाशिक येथील रयत संस्थेच्या माध्यमातून केल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
एकलव्य रेसीडेन्सीयल स्कुल येथील अधिक्षक प्राचार्य व कर्मचार्यामध्ये समन्वय नसल्याने या शाळेचा कारभार निष्काळजीपणे चालविल्या जात असल्याच्या तक्रारी नेहमीच पुढे आल्या आहेत. काही दिवसापूर्वी विद्यार्थीनीनी येथील कारभारावर आक्षेपही घेतला होता. तर आदिवासी प्रकल्प कार्यालया अंतर्गत अमोल मेटकर यांना या घटनेची माहिती सकाळी ११.३० वाजतापर्यंत नव्हती. काही दिवसापूर्वी शिक्षण विस्तार अधिकारी साखरकर यांनी शाळेला भेट दिल्याची माहिती दिली. या विद्यालयात नेहमीच शिक्षक व कर्मचारी अनुपस्थित असतात. या शाळेची देखरेख कंत्राटी कर्मचार्याच्या भरवश्यावर चालविल्या जाते. या घटनेची माहिती होताच माजी आमदार केवलराम काळे यांनी विद्यार्थ्यांची भेट घेत आवश्यकते उपचार देण्याबाबत निर्देश दिले तर आमदार राजकुमार पटेल यांनीही उपचाराबाबत दुरध्वनीवरून आढावा घेतला आहे.

Back to top button